मुंबई : दमदार फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा तिसरा सलामीवीर फलंदाज आहे, असं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं. त्यामुळे न्यूझीलंविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याला सलामीला उतरवलं जाणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.


शिखर धवन आणि रोहित शर्मा टीम इंडियाचे नियमित सलामीवीर फलंदाज आहेत. शिखर धवनच्या अनुपस्थितीत दिलेल्या संधीचा फायदा घेत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत चार अर्धशतकं ठोकले. या मालिकेत भारताने 4-1 ने विजय नोंदवला होता.

रहाणेने तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेतला आहे. केएल राहुलही सलामीवीर फलंदाजांच्या स्पर्धेत आहे. मात्र अजिंक्य रहाणेने संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली, असं विराटने सांगितलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेच्या पूर्वसंध्येला बोलताना विराटने अनेक विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली. 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे.

एकसारखे चार खेळाडू संघात असतात तेव्हा अशाच पद्धतीने संतुलन साधावं लागतं आणि एकाला अंतिम अकरामधून बाहेर रहावंच लागतं, असं विराटने स्पष्ट केलं. शिवाय रहाणे मधल्या फळीतील फलंदाज नसल्याचं सांगायलाही तो विसरला नाही.

‘’.... म्हणून कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलला संधी’’

कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या फिरकीपटू जोडी दमदार कामगिरी करत असल्याचं विराटने सांगितलं. विश्वचषकापूर्वी गोलंदाजी मजबूत करायची आहे. या दोघांसोबत खेळण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं, मात्र त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केल्याने संधी देण्यात येत आहे, असं विराटने स्पष्ट केलं.

रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा गेल्या सहा ते सात वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत आहेत. मात्र या युवा खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे आणि विश्वचषकापूर्वी गोलंदाजांची एक चांगली फळी तयार झाली आहे, असं विराटने सांगितलं.