मुंबई : माजी टीम डायरेक्टर रवी शास्त्री, निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 57 जणांनी अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जून होती. सदर मुदतीआधी देशविदेशातून 57 उमेदवारांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याची माहिती बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यात रवी शास्त्री आणि संदीप पाटील यांच्यासह वेंकटेश प्रसाद, बलविंदरसिंग संधू, लालचंद राजपूत, प्रवीण अमरे, हृषिकेश कानिटकर आदी नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. त्यात हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. मात्र सदर उमेदवाराला हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल, असंही बीसीसीआयनं नमूद केलं होतं. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवताना नऊ मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी सहाव्या मुद्यात म्हटलं आहे की, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवाराला आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असणं, त्याचं संभाषणकौशल्य उत्तम असणं अनिवार्य आहे. त्याचं इंग्रजीवर प्रभुत्व असावं. आपल्याला काय म्हणायचंय ते परिणामकारकरित्या खेळाडूंपर्यंत त्याच्याकडून अपेक्षित आहे. हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल. मात्र हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल.
संबंधित बातम्या