''या तरुणांना आयएसआयच्या एका एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं. बस आणि दारुचे अड्डे जाळून खालिस्तानचा जनमत संग्रह-2020 च्या मुद्द्याचा प्रचार करण्याची जबाबदारी या तरुणांवर देण्यात आली होती,'' अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली.
''या चार युवकांना सोमवारी शहीद भगत सिंह नगरमधून अटक करण्यात आली. ते एका दारुच्या भट्टीवर आग लावण्यासाठी निघाले होते. त्यांच्याकडून दहा लिटर डिझेल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं,'' असंही पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं.
दीप कौर उर्फ कुलवीर नावाच्या महिलेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला कट्टरतावादाचं प्रशिक्षण दिल्याची कबुली या तरुणांनी प्राथमिक चौकशीत दिली. या महिलेने नंतर आपली ओळख फतेह सिंह नावाच्या आयएसआय एजंटशी करुन दिल्याचंही या संशयितांनी सांगितलं.
''फतेह सिंहने या तरुणांना दारुची दुकानं आणि बस पेटवून वातावरण गढूळ करण्याची जबाबदारी दिली होती. शिवाय विविध ठिकाणी रेफरेंडम-2020 चे पोस्टर लावण्यासाठीही सांगितलं होतं,'' अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्या युवकांची नावं मनवीर सिंह, जसप्रीत सिंह, सुखविंदर सिंह आणि रणधीर सिंह अशी सांगितली जात आहेत. हे सर्व तरुण शहीद भगत सिंह नगर जिल्ह्यातील खानखाना गावचे आहेत.