भारतीय महिलांच्या प्रेग्नंसी विषयक धक्कादायक सत्य
भारताला दरवर्षी 1 कोटी 20 लाख युनिट रक्ताची गरज आहे. मात्र केवळ 90 लाख युनिट रक्त साठवलं जातं. ज्याचं प्रमाण 25 टक्क्यांनी कमी आहे, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.
डब्ल्यूएचओनुसार भारतामध्ये रक्त पुरवठा कमी आहे. प्रत्येक देशाला कमीत कमी एक टक्के रक्तसाठा आरक्षित ठेवणं अपेक्षित आहे.
गरोदर महिला मृत्यूच्या साल 2012-13 मधील आकडेवारीनुसार प्रत्येकी एक लाख मुलांच्या जन्मानंतर 167 महिलांचा मृत्यू होतो. गरोदर महिलांचे सर्वात जास्त 300 मृत्यू आसाम राज्यात तर सर्वात कमी 61 मृत्यू केरळमध्ये झाले आहेत.
गरोदर महिलांच्या मृत्यूमुळे भारत आतापर्यंत एमडीजी म्हणजेच मिलेनिअम डेव्हलपमेंट गोल गाठू शकलेला नाही. एमडीजी अंतर्गत गरोदर महिलांचा मृत्यू दर कमी करणं आणि गरोदर स्त्रियांना सर्व आवश्यक सेवा पुरवण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.
प्रसुतीनंतर 24 तासात 500 मिली किंवा एक हजार मिली लिटरपेक्षा जास्त रक्तस्त्राव झाल्यास अति रक्तस्त्राव समजला जातो.
प्रसुतीवेळी रक्तस्त्राव हि सर्वात मोठी समस्या आहे. दोन तृतीयांश महिलांचा यामुळे मृत्यू होतो. तसंच आपत्कालीन प्रसुतीवेळी गर्भाशय फाटल्यामुळे देखील 1 लाख 83 हजार महिलांचा मृत्यू होतो. गरोदर महिलांचा मृत्यूदर 17.7 टक्के आहे, तर नवजात मृत्यू दर 37.5 टक्के आहे, असं डब्ल्यूएचओने सांगितलं आहे.
गरोदर असताना किंवा प्रसुतीवेळी प्रत्येक पाच मिनिटाला एका मातेचा मृत्यू होतो. प्रसुती संदर्भातील कारणांमुळे दरवर्षी 5 लाख 29 हजार गरोदर स्त्रियांचा मृत्यू होतो, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओने सांगितलं आहे. यामध्ये 1 लाख 36 हजार स्त्रिया भारतातील असतात, असही संघटनेने सांगितलं आहे.