यवतमाळ : जिल्ह्यात पावसामुळे हाहा:कार सुरू आहे. यवतमाळमधील जवळपास 37  गावांमध्ये ( Yavatmal flood) पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील झोला या संपूर्ण गावालाच पुराने वेढा दिला आहे. त्यामुळे या गावातील सर्वच लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहेत. तर पुराचा फटका बसलेल्या यवतमाळमधील जवळपास साडेतीन हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थरांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पुराने अक्षरश: नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 


वणी वरोरा मार्गावरील झोला है वर्धा नदी काठावरील 950 लोकवस्तीचे गाव आहे. मंगळवार रात्री 12 वाजता वर्धा नदीच्या पाण्यात अचानक वाढ होऊ लागली. पुराचे पाणी गावात शिरू लागले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावात एकच हलकल्लोळ उडाला. नागरिक सैरावरा पळू लागले. चिल्यापिल्यांना घेऊन अंधारातच गावाबाहेर निघू लागले. काहींनी जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना पिटाळून गावाबाहेर काढले. 


वणी तालुक्यातील 11 गावांना पुराचा फटका
बुधवारी सकाळी झोला गावात आणखीनच भीषण परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण गाव पुराच्या विळख्यात सापडले. जिल्हात वर्धा नदी काठावरील बाबुळगाव, कळंब, राळेगाव, वनी या भागात पुराच्या वेढात जवळपास वीस गावे अडकली तर एकट्या वणी तालुक्यात 11 गावांना पुराचा फटका बसला आहे.  


पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर 
पुराच्या वेढ्यात वणी तालुक्यातील कोना, झोला या गावांवरही हीच परिस्थिती ओढवली. आता या सर्व गावकऱ्यांना प्रशासनाने सावर्ला येथे उपलब्ध करून दिलेल्या शिबिरात आश्रय देण्यात आला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर घडलेला सर्व प्रकार अंगाचा थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी एबीपी माझाने सावर्ला येथील शिबिरात जाऊन तेथील पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी प्रत्येकाने एबीपी माझा जवळ आपली आपबीती कथन केली.
 
37 गावांना पुराचा वेढा 
वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली,  जुगाद, सेलू, झोला रांगणा, कोना, पिंपळगाव, नायगाव, उकणी , शेलू, कवडशी, शिवणी,  चिंचोली या गावांना पुराचा वेढा बसला होता. लोकांना बोटी द्वारे बाहेर काढण्यात आले. शिवणी आणि चिंचोली  गावातील नागरिकांची कैलासनागर येथील सांस्कृतिक हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या भागात दौरा करून ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बाबीचा आढावा घेतला. 
 
जीव वाचविण्यासाठी धावाधाव 
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूर 1994 च्या पुरापेक्षाही महाभयंकर होता. गावाभोवती पाण्याचा विळखा पडल्याने गावातील कुटुंबे दहशतीखाली आली होती. या पुरात अनेकांची घर आणि शेतीही बुडाली होती. त्यानंतरचा हा सर्वात मोठा पूर आहे. जीव वाचविण्यासाठी रात्रीच्यावेळी अक्षरश: बैलबंडीने कुटुंबासह  गावाबाहेर पडावे लागले. घरातील धान्य, पैसे वाहून गेले. घरात पाणी साचले आहे. वृद्धांना अक्षरश: उचलून गावाबाहेर आणावे लागले. जिल्ह्यात यापूर्वी दोन वेळा पुराचा सामना करावा लागला. परंतु, या वर्षीचा पूर महाभयंकर होता. 


तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात 110 महसूल मंडळापैकी 95 मंडळात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी झाली आहे. जुलै महिन्यात 451 मिलिमीटर पाऊस झाला, हा पाऊस जुलै महिन्याच्या सरासरी पेक्षा 272 टक्के जास्त आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3318 नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. 3 लाख हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे 2066 घरांचे अंशत: तर 20 घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. 60 जनावरे मृत्यूमुखी पडली. त्यांचे पंचनामे करण्यात येत आहेत. 


जिल्ह्यात पाण्याचा जोर ओसरल्याने वणी तालुका वगळता इतर सर्व तालुक्यातील नागरिक त्यांच्या घरी परत गेले आहेत. सध्या केवळ वणी तालुक्याच्या काही गावातील स्थलांतरीत नागरिक शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निवाऱ्यात राहत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या बचाव दलच्या मिळून एकूण सहा बोटीद्वारे जिल्हा प्रशासन नागरिकांच्या संपर्कात आहे. तसेच वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या नागरिकांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Yavatmal Rain : पैनगंगा नदीला पूर, यवतमाळ जिल्ह्यातील 20 ते 22 हजार हेक्टर शेतीचं नुकसान, जिल्हाधिकारी करणार नुकसानग्रस्त भागाची पाहणी