Continues below advertisement

यवतमाळ : राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय जारी केल्याने मराठा समाजातील नागरिकांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं, त्याचप्रमाणे बंजारा (Banjara) समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. बीड, जालना, सोलापूनंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुरातही आज बंजारा समाजाने ठिय्या आंदोलन केले. बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे एसटीत आरक्षण लागू करण्याची मागणी करत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना बंजारा समाजाकडून निवेदन देण्यात आले. दुसरीकडे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी (Yavatmal) येथील महंतांनीही बंजारा समाजाच्या आमदारांना (MLA) थेट इशारा दिला आहे. तसेच, बंजारा आणि वंजारी समाज वेगवेगळा असल्याचेही त्यांनी म्हटलं.

हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा समाजातील नेत्यांचा, समाज बांधवांकडून लढा सुरू करण्यात आला आहे. नुकतेच, बीडमधील सभेत आमदार धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारी समाज एकच असून बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, असे जाहीर वक्तव्य केले होते. धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला असून बंजारा समाजाचे नेते पुढे येऊन दोन्ही समाज आरक्षणाच्या दृष्टीतून वेगळे असल्याचं सांगत आहेत. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आता बंजारा समाजाचे तीर्थस्थान असलेल्या पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनीही आपली भूमिका मांडली आहे.

Continues below advertisement

धनंजय मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावर पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी बोलताना बंजारा आणि वंजारी एक नसल्याचे म्हटले. बंजारा (vj अ ) समाज आहे. तर, वंजारी हा Nt(क) समाज आहे. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून दोन्ही समाजाला वेगवेगळे आरक्षण आहे. मराठवाड्यात बंजारा समाज हे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धनंजय मुंडे यांनी आपलं मत व्यक्त केलं, पण आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज वेगळे आहेत, असे जितेंद्र महाराज यांनी म्हटले. बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात बसत असेल तर निश्चितच त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशी भूमिका आमची राहील. तसेच राज्यात 5 आमदार बंजारा समाजाचे आहेत, सोबतच 40 मतदार संघामध्ये बंजारा समाज बहुल आहे. त्यामुळे येथील आमदारांनी सुद्धा बंजारा समाजाच्या या मागणीसाठी पाठिंबा द्यावा. अन्यथा धर्मपिठावरुन त्यांच्याविरोधात आदेश काढण्याचाही भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही महंत जितेंद्र महाराजांनी बंजारा समाजाच्या आमदारांना दिला आहे.

धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण (dhananjay munde)

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोणी काय विरोध करावा, हे माझ्या हातात नाही. स्थानिक पातळीवर आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना आणि वागताना, वंजारा आणि बंजारा ही जात वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून, बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केले आहे. त्या परिस्थितीत मी ते बोललो आहे. त्या बोलण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा. अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे कोण होते, हे सुद्धा सोशल मीडियावर समोर आले आहे. कुठेतरी चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं, काहीतरी झालं पाहिजे ना, अशी काही विघ्नसंतोषी लोकं आहेत, ते हे सगळे प्रकार करत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. 

हेही वाचा

पुढचं स्टेशन बीड... तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती; 16 स्थानके, 261 किमी मार्ग, पहिल्या रेल्वेची उत्सुकता, काय आहे इतिहास?