यवतमाळ :  यवतमाळच्या आर्णी येथील एका शाळकरी मुलाने फ्री फायर गेमचे रिचार्ज करण्यासाठी सोशल मीडियाच्या  मदतीने वडिलांकडे खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. आर्णी पोलिसांनी  या खंडणीच्या घटनेचा छडा लावला.


आर्णी येथील एका व्यावसायिकाने आर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीकडून मुलाचे अपहरण करत त्याला ठार करण्याची धमकी दिली जात आहे. तसेच मोबदल्यात एक लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार केली. आर्णीसारख्या लहानशा गावात खंडणीचा प्रकार घडल्याने पोलिसांनीही कसून शोध घेणे सुरू केले. यात फिर्यादीचा मुलगाच फेक आयडी वापरून वडिलांना धमकावत असल्याचे माहिती पुढे आली आहे. 


शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढविली आहे.  त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावाची फेक आयडी बनवले. दोन्ही फेक आयडींचा वापर करत वारंवार वडिलांनाच धमक्या देणे सुरू केले. इतकेच नव्हेतर, त्याने मुलाचा खून केला जाईल, त्याच्या पोस्टमार्टमची तयारी ठेवा, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यवतमाळ सायबर सेल टीमने अधिक तपास केला आणि या प्रकरणाचा उलगडा केला. 


खुद्द मुलगाच बापाला धमकावत होता 


खंडणीचे पैसे घेऊन त्यातून फ्री फायर गेमसाठी रिचार्ज करावे आणि  नागपूरला पुढील शिक्षणासाठी जायचे यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांना धमकी देण्यास सुरूवात केली. तयार केलेला प्लॅन यशस्वी होईल असे वाटले मात्र पोलिसांनी तत्पूर्वी या प्रकरणाचा शोध लावला. सायबर सेलच्या माध्यमातून या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. यात धक्कादायक वास्तव पुढे आले. इयत्ता दहावीला असलेल्या मुलानेच वडिलांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. या गंभीर प्रकरणानंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळकरी मुलांमध्ये मोबाईल व समाजमाध्यमांची मोठी क्रेझ आहे. प्रत्येक मुलाला मोबाईल लागतोच. त्याचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पालकांनी काय करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.