World Humanitarian Day 2021 : 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिवस म्हणून मानला जातो. जगभरातील मानवतावाद्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानवता हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. याच मूल्याचा आणि हे मूल्य खऱ्या अर्थाने अंगीकारणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक मानवतावादी दिवस म्हणून साजरा केला जातो. गरजू आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी मनोभावे, अखंड आणि अविरतपणे तत्पर असणाऱ्या मानवतावादी लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. गरजू लोकांना योग्यवेळी योग्य ते सहाय्य मिळालं पाहिजे हा या दिवसाचा खरा संदेश आहे.


इराकमधील बगदाद येथील कॅनाल हॉटेलवर 2003 च्या बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ज्यात इराकमधील मुख्य मानवतावादी सर्जियो व्हेइरा डी मेलो यांच्यासह 22 लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासून हा दिवस जागतिक मानवता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगदाद दुर्घटनेनंतर 4 हजारांहून अधिक मदत कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले, तर अनेकांना अटक करण्यात आली होती. या सगळ्यांच्या बलिदान प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
 

दरवर्षी युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीमध्ये नवीन थीमसह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

2021 ची थीम काय?

वर्ष 2021 साठी जागतिक मानवतावादी दिवस हा हवामान संकट आणि त्याचा तात्काळ मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. जागतिक नेत्यांना हवामान बदलाला आव्हान देण्यासाठी आणि जगातील सर्वात असुरक्षित लोकांना वाचवण्यासाठी अर्थपूर्ण पावलं उचलण्यासाठी दबाव आणणं हा यामागचा हेतू आहे.

“हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी आणि पृथ्वी ग्रहाचं भविष्य सुरक्षित करण्यावर केंद्रित बहुतांश हवामान मोहिमांसह, जागतिक मानवतावादी दिवस 2021 हा हवामान संकटाचा तात्काळ मानवी खर्च हायलाइट करेल आणि जागतिक नेत्यांवर अर्थपूर्ण हवामान कारवाई करण्यासाठी दबाव आणेल” जागतिक संस्थेनेकडून ही थीम आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

जागतिक मानवता दिवसाचा इतिहास

इराकमधील बगदाद मधल्या कॅनाल हॉटेलवर 2003 च्या बॉम्बहल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा करण्यात आला होता, ज्यात इराकमधील मुख्य मानवतावादी, सर्जियो व्हीएरा डी मेलो यांच्यासह 22 लोकांचा बळी गेला. जिनेव्हा आणि न्यूयॉर्कमध्ये फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान आणि ब्राझीलमधल्या मानवतावादी लोकांसह डी मेलो यांनी घातलेल्या पायाच्या कार्याचा परिणाम म्हणजेच हा आजचा जागतिक मानवतावादी दिवस आहे.

राजदूतांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेअंतर्गत ठरावाचा मसुदा पुढे नेण्याचे काम केले. डी मेलो आणि त्याच्यासारख्या अनेक मानवतावादी लोकांच्या बलिदानाची कबुली देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक मानवतावादी दिवसाची स्थापना केली. संयुक्त राष्ट्र महासभेने 19 August ऑगस्ट 2009 मध्ये जागतिक मानवतावादी दिनाची औपचारिक घोषणा केली.

प्रत्येकाला मानवतावादी मूल्यांची आठवण करून देण्यासह जगभर मानवतावादी कार्य करत असताना आपले प्राण गमावलेल्या हजारो कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे

जागतिक मानवता दिवसाचं महत्त्व

मानवतावादी मिशन हे दया, सहानुभूती, निष्पक्षता, तटस्थता आणि स्वातंत्र्यासह अनेक संस्थापक तत्त्वांवर आधारित आहे. मानवतावादी मदत कार्यकर्ते हे राष्ट्रीयता, सामाजिक गट, धर्म, लिंग, वंश किंवा इतर कोणत्याही आधारावर भेदभाव न करता आपत्तीग्रस्त गटांचे आयुष्य वाचवण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचं दीर्घकालीन पुनर्वसन करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतात. मानवतावादी मदत कार्यकर्त्यांचा आदर केलाच पाहिजे असा संदेशही या माध्यमातून दिला जातो.

मानवतावाद्यांपुढे काय आव्हान ?

2021 मध्ये 235 दशलक्ष लोकांना मानवी सहाय्य आणि संरक्षणाची आवश्यकता असेल असा अंदाज एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. ही संख्या जगभरात 33 लोकांमध्ये 1 वर पोहोचली आहे. संयुक्त राष्ट्र आणि भागीदार संस्थांनी 56 देशांतील 160 दशलक्ष लोकांना सर्वात जास्त मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी एकूण 35 अब्ज डॉलर्सची आवश्यकता असेल.

दहशत आणि हिंसाचाराच्या संकटाच्या दरम्यान जगभरातील लोकांना अन्न, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा मिळण्यासाठी लाखो लोक दररोज संघर्ष करत आहेत. इतकंच नव्हे तर एड्ससारख्या रोगांना बळी पडलेल्यांची सेवा करणारी मंडळी तसेच कुपोषण, रोगराई, नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकं व त्यांच्या पुर्नवसनासाठी आयोजित केलेल्या कार्याची दखल देखील ह्यात घेतली गेली. या लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना नवीन दिशा देण्यासाठी जागतिक मानवतावादी दिनासारख्या कार्यक्रमांचं महत्त्व वाढतं.

#TheHumanRace मध्ये सामील व्हा

16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान असुरक्षित लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठी 100 मिनिटं आपल्या पसंतीच्या कोणत्याही प्रकारची धाव, सवारी, पोहणे, चालणे करा असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय विकसनशील देशांमध्ये हवामान शमन आणि अनुकूलतेसाठी वार्षिक काहीतरी उपक्रम राबवा असं आवाहन करण्यात आलं आहे.