न्यूयॉर्क : अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांना भारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.


श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटलं आहे.

विशेषत: जर महिला भारतात जाणार असतील तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घ्यावी. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे.

काय आहे अॅडव्हायजरी?

दहशतवादी कारवाया आणि काश्मिरी लोकांचा उद्रेक पाहता जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) भेट देणं टाळावं

भारत-पाक सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात सातत्यानं लष्करी कारवाया होत आहेत, तिथून प्रवास टाळावा

मध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात.

महिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी

भारतात बलात्काराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी

अमेरिकेतील सरकारी कर्मचाऱ्यांना सेव्हन सिस्टर्स अर्थात आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या सात राज्यांमध्ये जाण्याची परवानगी नाही.

महाराष्ट्राच्या पूर्व भागात माओवादी आणि नक्षलींचा उपद्रव असल्याचंही खबरदारी म्हणून सांगितलं.