न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर काय बोलावं हे सुचेनासं झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत खोटं बोलण्यास सुरुवात केली. भारत शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी घरगुती राजकारणाला पसंती देत असल्याची खुन्नस पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी काढली.


भारतानेच द्विपक्षीय वार्ता रद्द केल्याचा आरोप कुरैशी यांनी केला. पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर शांततेसाठी बातचीत करायची आहे, पण नवी दिल्ली शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुनही भारताने आपला काश्मीरचा राग काढला. आम्हाला गंभीर आणि व्यापक चर्चा करायची आहे, ज्याने सर्व समस्यांचं समाधान होईल, असं कुरैशी म्हणाले.

पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी

''भारताकडून सतत एलओसीवर सीजफायरचं उल्लंघन केलं जातं. आम्हाला हे सांगायचंय की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने एलओसी पार केली किंवा लिमिटेड वॉरचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा पलटवार झेलावा लागेल. दक्षिण आशियामध्ये न्युक्लिअर संतुलन ठेवण्याची बातचीत केली जाते. पण पाकिस्तान आण्विक शस्त्रांचा वापर न करण्याची खात्री देऊ शकत नाही,'' असं कुरैशी म्हणाले.

सुषमा स्वराज कडाडल्या, पाकिस्तानला घाम

पाकिस्तानाच्या दहशतवादी कुरापती रोखल्या नाहीत, तर संपूर्ण जग दहशतावादाच्या आगीत जळून खाक होईल, असे म्हणत सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेतून पाकिस्तानचा बुरखा फाडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या कुरापती जगासमोर मांडल्या.

दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तान तरबेज आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. तसेच, 9/11 चा मास्टरमाईंड ठार करण्यात आला, मात्र 26/11 चा मास्टरमाईंड उजळ माथ्याने फिरतोय, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.

दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तान तरबेज : सुषमा स्वराज

“आमचा शेजारी देश पाकिस्तान दहशतवाद पसरवण्यात तरबेज आहे. भारतासाठी सर्वात दुख:दायक गोष्ट अशी आहे की, आमच्या शेजारी देशातील दहशतवादच आमच्यासाठी आव्हान बनलंय.”, असे म्हणत स्वराज पुढे म्हणाल्या, “पाकिस्तानचा खरा चेहरा संपूर्ण जगाने आता ओळखला आहे. पाकिस्तानमुळेच दोन्ही देशातील चर्चेत अडथळा येतोय. 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय.”

दहशतवादी कुरापती सुरु असताना चर्चा शक्य नाही : सुषमा स्वराज

“दोन्ही देशंमध्ये चर्चा व्हावी, यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केलेत. मात्र पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींच्या वातावरणात दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते का? हे शक्य नाही.” हे ठणकावून सांगतानाच सुषमा स्वराज पुढे म्हणाले, “पाकिस्तान दहशतवाद्यांचा फोटो असलेलं टपाल तिकीट छापतं. अशा दहशतवादी कुरापतींकडे किती काळ दुर्लक्ष करणार?”

दरम्यान, यावेळी सुषमा स्वराज यांनी भारत सरकारच्या योजनांबद्दलही माहिती दिली. जनधन योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजना आणि त्यांचा देशातील नागरिकांना होणारा फायदा, यासंबंधी आकडेवारी आणि माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावरुन सुषमा स्वराज यांनी सांगितली.

सुषमा स्वराज यांचं संपूर्ण भाषण