आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती
एबीपी माझा वेब टीम | 24 Jul 2017 01:16 PM (IST)
डोकलाम सीमावादवरून चीनने पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. एकवेळ डोंगर पर्वतांना पाडणे सोपे आहे, मात्र चीनच्या लष्कराला धक्का लावणं सोपं नाही, अशी दर्पोक्ती चिनी लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
बिजिंग : डोकलाम सीमावादवरून चीनने पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. एकवेळ डोंगर पर्वतांना पाडणे सोपे आहे, मात्र चीनच्या लष्कराला धक्का लावणं सोपं नाही, अशी दर्पोक्ती चिनी लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे. चिनी लष्कराचा प्रवक्ता वू कियान याने भारताला धमकावत चीनच्या रक्षणासंबंधी चिनी लष्कराचा आत्मविश्वास कोणीही खच्ची करु शकत नाही, असंही म्हटलं आहे. शिवाय, तिबेटमधील डोकलाम परिस्थिती पाहून सीमेवर सैन्य बळ वाढवू, अशी धमकी दिली आहे. भारताला जाहीर धमकी देताना चिनी लष्कर प्रवक्त्यानं म्हणलंय की, ''भारतानं कोणत्याही भ्रमात राहू नये. चिनी लष्कराचा 90 वर्षांचा इतिहास आमच्या क्षमतेची साक्ष देतो. देशाच्या सीमांचं रक्षण करण्याचा आमचा आत्मविश्वास कोणीही खच्ची करु शकत नाही. एकवेळ डोंगर, पर्वतांना पडणं सोपं आहे. पण चीनच्या लष्कराचा पाडाव करणं अशक्य आहे,'' अशी दर्पोक्ती चिनी लष्कर प्रवक्त्यानं दिली आहे. डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनदरम्यान 16 जूनपासून वाद सुरु असून, आज या वादाचा 39 वा दिवस आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून सातत्यानं भारताला धमकावण्याचं काम सुरु आहे. दुसरीकडे 27 जुलै रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल ब्रिक्स देशांच्या एनएसएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीन दौऱ्यावर जात आहे. या बैठकीत उभय देशांमध्ये डोकलाम वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नुकत्याच बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेतही चीननं भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला. चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं भारताला निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच भारतानं आपली स्थिती समजून घ्यावी, चीन जास्त वाट पाहणार नाही, अशी उघड धमकी चिनी राजदुतांनी दिली होती. संबंधित बातम्या