बिजिंग : "भारत पाकिस्तान सीमा भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. परंतु पाकिस्तानकडून त्यादृष्टीने कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर कारवाई करणे गरजेचे होते", अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. स्वराज चीनमध्ये झालेल्या आरआयसी परिषदेमध्ये बोलत होत्या. स्वराज यांनी चीनमध्ये भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत बालाकोट येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई हल्ल्याबाबतची माहिती दीली.


स्वराज म्हणाल्या की, "पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेले दहशतवादी भारतावर मोठे हल्ले करण्याची तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताला स्वतःहून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणे गरजेचे होते."

व्हिडीओ पाहा



भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज चीनमध्ये रशिया भारत आणि चीनच्या (आरआयसी)परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याचवेळी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला का केला याबाबतची कारणे स्वराज यांनी स्पष्ट केली.

व्हिडीओ पाहा