कोलंबो : टी-20 तिरंगी मालिकेतील पहिला सामना  सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेतून एक महत्त्वाची बातमी  समोर आली आहे. श्रीलंकेत १० दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.


श्रीलंकेच्या कँडी भागात बौद्ध आणि मुस्लिम समुदायातील वादाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

श्रीलंकेत वर्षभरापासून या दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून येथील हिंसाचार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे कँडी भागातील हिंसाचार इतर भागात पसरु नये यासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय आज श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.



(फोटो सौजन्य : बीसीसीआय)

दरम्यान, भारतीय संघ सध्या श्रीलंकेतच आहे. मात्र, तिरंगी मालिकेच्या वेळापत्रकानुसारच सर्व सामने खेळवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. कारण की, हिंसाचार कँडीमध्ये उसळला आहे पण तिरंगी मालिकेतील सर्व सामने हे कोलंबोमध्ये होणार आहेत. त्यामुळे या आणीबाणीचं कोणतंही सावट सामन्यांवर नसल्याचं समजतं आहे. आज संध्याकाळी सात वाजता भारत आणि श्रीलंकेत पहिला टी-20 सामना होणार आहे.