द.आशियात एकच देश दहशतवाद पसरवतोय : मोदी
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2016 02:12 AM (IST)
हांगझोऊ : दक्षिण आशियामधील दहशतवाद केवळ एकाच देशामुळे फोफावत आहे, असं भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला. जी-20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी मोदी बोलत होते. दहशतवादी हा दहशतवादी असतात. दक्षिण आशियात एकमेव देश आहे, जो आमच्या क्षेत्रात दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे, असं मोदी म्हणाले. तसंच दहशतवादाला पोसणाऱ्यांवर सर्वांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचं आवाहनही मोदींनी आंतरराष्ट्रीय नेत्यांसमोर केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकिस्तानचं नाव न घेता टीका केली. शून्य दहशतवाद हेच भारताचे धोरण आहे. त्यापेक्षा कमीची अपेक्षा करुन या धोक्याला रोखता येणार नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं. पाकव्याप्त काश्मीरमधून, पाकिस्तानमधून दहशतवादी सीमारेषा ओलांडत असल्याने चीन-पाक महामार्गाचा मुद्दा संवेदनशील असल्याचं मोदींनी याआधी म्हटलं होतं.