नवी दिल्ली: चीनने तिबेटमध्ये सुरु असलेल्या आपल्या एका वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ब्रम्हपुत्रा नदीच्या यरलुंग त्संगपो या उपनदीचे पाणी आडवले आहे. चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीन यापासून वीजनिर्मिती करणार असून, या नदीच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करणार आहे.


चीनने या नदीचे पाणी आडवल्याने भारत आणि बांगलादेश आदी देशांना अडचणींचा सामना करावा लागेल. कारण, यामुळे भारतातून वाहणाऱ्या या नदीच्या प्रवाहाच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.

तीन राज्यांवर परीणाम

यरलुंग त्संगपो या 2840 किलोमीटर लांब असलेल्या नदीचा उगम चीनमधील कैलास मानसरोवरात होतो. हीच नदी पुढे जाऊन भारतातून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रेला मिळते. ब्रम्हपुत्रा ही नदी भारतातील पूर्वोत्तर राज्यांतील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि असम आदी राज्यातून वाहते. त्यामुळे या उपनदीचे पाणी आडवल्याने अरुणाचल प्रदेश आणि असमच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.

2019 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित 

शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यरलुंग त्संगपो नदीवरील या वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम 2014 मध्ये सुरु करण्यात आले, तर 2019 पर्यंत याचे काम पूर्ण होणार होते. मात्र तत्पूर्वीच चीनने या नदीचे पाणी आडवल्याने भारताची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानकडून चीनच्या कुबड्या

भारताने सिंधू नदीचे पाणी आडवण्यासंबंधातील हालचाली सुरु केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांनी भारताला ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी आडवण्यावरुन धमकावलेही होते. कारण भारताने सिंधू नदीचे पाणी आडवले तर पाकिस्तानचा वाळवंट होऊ शकते. त्यामुळे अजीज यांनी चीनच्या कुबड्या घेऊन भारताला धमकावण्यास सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?

सिंधू करारावरुन घाबरलेल्या पाकची वर्ल्ड बँकेकडे धाव

मोदींच्या सिंधू नदी करारावरील भूमिकेने पाकला धडकी

खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका