नवी दिल्ली : पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हसन निसार यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. अजित डोभाल काय सांगतायेत ते ऐका, नाहीतर जगाच्या नकाशावरुन नष्ट व्हाल, असे म्हणत हसन निसार यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे.


"भारताचे एनएसए अजित डोभाल जे सांगतायेत, ते मान्य करा. अन्यथा जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान नष्ट होईल. पाकिस्तानात वेड्यांची सत्ता आहे. इथल्या लोकांना अणूबॉम्ब काय असतं, ते माहित नाहीय.", अशा शब्दात हसन निसार यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.

"भारताची लोकसंख्या एक अब्जहून अधिक आहे आणि पाकिस्तानची लोकसंख्या केवळ 20 कोटी आहे. विचार करा, युद्ध झाल्यास काय  होईल? तुमचे 18 कोटी तर जातीलच. पण त्याचवेळी भारताचे चारपट जास्त लोक यात गेली, तरी 20 कोटी उरतील.", असे हसन निसार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "हा एकप्रकारचा मुर्खपणा आहे की, पाकिस्तानने स्वत:हून शत्रू निर्माण केले आहेत. आऊट ऑफ द वे जाऊन शत्रू केले आणि अण्वस्त्र तयार केले. अण्वस्त्र तयार केले आहेत. मात्र, इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुस्तकं देत नाहीत, रुग्णांना औषधं देत नाहीत, लोकांना न्याय देत नाहीत."

"पाकिस्तान येता-जाता भारताला अणूबॉम्बची धमकी देतो. मात्र, याचा कधीच विचार करत नाही की, भारताने पाकिस्तानविरोधात अण्वस्त्र हल्ला सुरु केला, तर पाकिस्तानचं काय होईल. पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल आणि इतिहास बनून राहील.", असे निसार म्हणाले.