नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुटनिती वापरुन पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या. तसेच एलओसीवरही पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळेच आता पाकिस्तान बिथरला असल्याचे पाहायला मिळत आहे.


भारतासोबत लढणं सोपं जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानला शहाणपणा सुचलं आहे. पाकिस्तानने आता भारतासमोर नियंत्रण रेषेवरील (एलओसी) तणाव कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव भारताने मान्य करावा, यासाठी पाकिस्तानने एलओसीजवळच्या त्यांच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप्सना हटवण्याची तयारी दाखवली आहे.

पाकिस्तानी सैन्याने एलओसीजवळचे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स तात्पुरते बंद केले आहे. दरम्यान भारताने याबाबत म्हटले आहे की, पाकिस्तानने दहशतवाद आणि घुसखोरांना रोखणे हा एकमेव शांतीचा मार्ग आहे.

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर एलओसीजवळ तणाव निर्माण झाला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये एलओसीजवळ झालेल्या चकमींमध्ये भारतापेक्षा पाकिस्तानचे पाच ते सहापट अधिक नुकसान झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर बॉम्बफेक केली. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक दहशतवादी ठार केले. या एअर स्ट्राईकमध्ये एकूण किती दहशतवादी मारले गेले, याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.