नवी दिल्ली : आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान (Pakistan)  देश निर्मितीनंतर सर्वात मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. महागाईनं उच्चांक गाठला आहे.  दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी मोठं वक्तव्य केले आहे.  भारताशी आम्ही शांततेनं राहू इच्छितो, एकत्र बसून मार्ग काढूया असे पंतप्रधान मोदींना त्यांनी आवाहन केले आहे. तसेच तीन युद्धानंतर पाकिस्तानने मोठा धडा मिळाल्याची देखील कबुली त्यांनी दिली आहे.  अल अरबियाला दिलेल्या मुलाखतीत मोदींकडे शांततेचं अपील  केलं आहे. 


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारताशी झालेल्या तीन युद्धाविषयी पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले आहे. या मुलाखतीत त्यांनी भारताविषयी वक्तव्य केले आहे. भारताविषयी बोलताना त्यांची मवाळ भूमिका दिसली आहे. पंतप्रधान शहबाज शरिफ म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन युद्ध झाले आहेत.  प्रत्येक युद्धानंतर पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान खाली खाली गेला आहे. पाकिस्तानला आता धडा मिळाला आहे.


भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत. आपल्याला एक दुसऱ्यांसोबत राहावे लागणार आहे. आता हे दोन्ही देशांवर निर्भर करते आपण शांततेने राहू आणि प्रगती करूया. भारताशी झालेल्य युद्धानंतर पाकिस्तानल गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करावा लागला. त्यामुळे आपण एकत्र बसूया आणि मार्ग काढू, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ  म्हणाले.






 


मुलखती दरम्यान शहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. गरिबी नष्ट करण्यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. तसेच देशात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. पुढे म्हणाले, आम्हाला आमच्या देशातील नागरिकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार या सारख्या सुविधा द्यायच्या आहेत.   दारूगोळा  तयार करण्यात आम्हाला आमची संसाधने खर्च करायची नाहीत. हे माझे व्हिजन आहे. हाच संदेश मला पंतप्रधान मोदींनाही द्यायचा आहे.


शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींना शांततेसाठी आवहान केले.  पण पुन्हा एकदा काश्मीरवर बरळले आहे.  त्यांनी मुलाखतीत सांगितले की, मला पंतप्रधान मोदींना सांगायचे आहे की, आम्हाला शांततेत जगायचे आहे, पण काश्मीरमध्ये जे काही चालले आहे ते थांबवण्याची गरज आहे. काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, माझा पंतप्रधान मोदींना संदेश आहे की,  आपण  काश्मीरसारख्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करावी.  पुढे ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशांकडे अण्वस्त्र संपन्न देश आहेत. दोन्ही देशांनी या दिशेने वाटचाल केली तर काय होईल हे सर्वांना माहित आहे.