ऑपरेशन संकटमोचन : सुदानमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 03:23 AM (IST)
नवी दिल्ली : दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाचा फटका बसलेल्या 600 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन संकटमोचन' सुरु केलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या ऑपरेशनचं नेतृत्त्व करणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबतची माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा, संयुक्त सचिव सतबीर सिंह आणि संचालक अंजनी कुमार हे तीन वरिष्ठ अधिकारी जनरल व्ही. के. सिंह यांच्यासोबत असतील. सुदानमधील भारतीय राजदूत श्रीकुमार मेनन आणि त्यांची टीम या ऑपरेशनला पार पाडत आहे. हवाईदलाची दोन C-17 ही विमानं सुदानमध्ये रवाना केली आहे. हिंसेचं कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडलं आहे. यामध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी सोमवारीच युद्धविरामची घोषणा केली होती.