नवी दिल्ली : भारताचा सर्वात मोठा शत्रू जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातल्या सर्व वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांनी या बातमीची शक्यता वर्तवली आहे. मात्र अजूनही या वृत्ताला पाकिस्तानने दुजोरा दिलेला नाही.



पाकिस्तानच्या स्थानिक मीडियामध्ये मसूद अजहरच्या मृत्यूची चर्चा सुरु आहे. अजहरचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. अद्याप मसूदच्या मृत्यूबाबत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


व्हिडीओ- भारताच्या खतरनाक हल्ल्यात मसूद अजहरचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त 



मसूद अजहर किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच मसूदची प्रकृती एवढी खालावली आहे की तो घराबाहेरही पडू शकत नसल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची म्हटलं होतं.


मात्र मसूद अजहर हा भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मारला गेल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. तर नाचक्की होईल या भीतीने पाकिस्तानने अद्याप याबाबत माहिती दिली नसून तो आजारी असल्याचा कांगावा करत असल्याच्याही चर्चा सुरु आहे.


कोण आहे मसूद अजहर?


मसूद अजहरचा जन्म पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये झाला आहे. त्याचं शिक्षण जामिया उलूम उल इस्लामियात झालं आहे. त्यानंतर हरकत उल अंसारशी जोडल्यानंतर त्याने दहशतवादी कारवायांना सुरुवात केली.


मसूद 1994 मध्ये श्रीनगरमध्ये आला होता, त्यावेळी भारत सरकारने त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. दहशतवाद्यांनी 1995 मध्ये काश्मीरमधून काही परदेशी पर्यटकांचं अपहरण केलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यातील एक पर्यटक पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी सर्व पर्यटकांची हत्या केली.


त्यानंतर डिसेंबर, 1999 मध्ये दहशतवाद्यांनी काठमांडू एअरपोर्टवरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे जाणाऱ्या IC814 विमानाचं अपहरण केलं आणि विमान अफगाणिस्तानच्या कंधार येथे घेऊन गेले. विमान अपहरण करून प्रवाशांना वेठीस धरलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यानंतर प्रवाशांच्या जीवाच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद अजहरला भारताच्या तावडीतून सोडवून घेतलं.


VIDEO-  ...म्हणून हाफिज, मसूद आणि दाऊदची आता खैर नाही