जम्मू-काश्मीर: पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लघंन करण्यात आलं असून मागील तासाभरापासून सीमेपलीकडून गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.


सीमारेषेजवळ गस्त घालणाऱ्या एका तुकडीवर पाकिस्तानी रेंजर्सकडून आज रात्री नऊच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये शीख रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबाराला भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मागील तासाभरापासून दोन्ही बाजूनं जोरदार गोळीबार सुरु आहे. काल देखील करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याची परंपरा पाकिस्ताननं यंदाही कायम राखली. मात्र, भारतीय जवानांनी देखील चोख उत्तर देत पाकिस्तानच्या 15 रेंजर्सना कंठस्नान घातलं.

जम्मू काश्मीरातील सीमारेषेवर बीएसएफनं तब्बल १५ पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातलं. गुरूवारपासून जम्मू काश्मीरातील ५ सेक्टर्समध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यानं अचानक गोळीबार सुरु केला.

भारतीय जवानांनी देखील ईट का जवाब पत्थर से देणं पसंद केलं. भारताचा हल्ला किती तीव्र होता याचा अनुभव पाकिस्तानातील शकरगढमध्ये तैनात पाकिस्तानच्या सैन्याला आला. सीमा न ओलांडता भारतीय सैन्यानं जम्मू-काश्मीरच्या सांबामधून शकरगढवर हल्ला चढवला.

भारतीय जवानांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या तुकडीची चांगलीच दाणादाण उडाली. 28 आणि 29 सप्टेंबरला भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच खवळला आहे.

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं तब्बल 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. मात्र, भारतानं देखील प्रत्येकवेळी पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर दिलं आहे.

दरम्यान भारतीय हद्दीतील सीमेलगतच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न जवानांना सतावतो आहे.

कारण कालच पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीर आणि राजौरी जिल्ह्यातील काही घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच कठुआ भागातील गोळीबारात एक मुलगी जखमी झाली. त्यामुळं गावकऱ्यांना सुरक्षित ठेवून शत्रूचे अड्डे नेस्तनाबूत करण्याचं दुहेरी आव्हान भारतीय लष्करासमोर उभं ठाकलं आहे. हे आव्हान आपले जवान लिलया पेलण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत यात तिळमात्र शंका नाही.

संबंधित बातम्या:

पाकच्या डझनभर चौक्या उद्ध्वस्त, वॉच टॉवरही पाडले