इस्लामाबाद: गुरुवारी मध्यरात्री भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आज संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र, या अधिवेशनादरम्यान पाकिस्तानातील तहरीक-ए-इंसाफ पक्षाचा प्रमुख इमरान खानने सभात्याग केला. या आधिवेशनात सहभागी होणं म्हणजे, पंतप्रधान नवाज शरीफांचे नेतृत्व मान्य केल्यासारखे असल्याचे त्याने सभात्याग केल्यानंतर म्हटलं आहे.


पीओकेवर भारतीय सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून भारत पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. यावरच चर्चा करण्यासाठी नवाज शरीफ यांनी संसदेच्या दोन्ही सदनाचं संयुक्त विशेष अधिवेशन बोलवलंय.

यावर तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या बैठकीनंतर इमरान खानने आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला की, ''या अधिवेशनात सहभागी होणे, म्हणजे शरीफांचे नेतृत्व मान्य करण्यासारखे आहे.'' इमरान खानने शरीफांवर भ्रष्टाचारचे आरोप करुन त्यांच्या विरोधात पाकिस्तानात रान उठवले आहे.

इमरान खान म्हणाला की,'' पंतप्रधांनासंबंधी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यामुळे बुधवारच्या अधिवेशनात भाग घेणे म्हणजे, त्यांना समर्थन देणे होईल. पनामा वृत्तपत्राने दिलेल्या त्यांच्या संपत्तीमुळे त्यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अधिकार नाही. तसेच पेशावरमधील सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरु केलेल्या दहशतवादविरोधातील मोहीम यशस्वीपणे राबवण्यात अपयशी ठरले आहेत.''