लाहौर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. 'मशरिकी पाकिस्तान (बांगलादेश)चा बदला घ्यायचा असेल, तर काश्मीरला उद्धवस्त करु,' अशी धमकी हाफिजने दिली आहे.


ते पुढे म्हणाला की, “भारताने लाखो प्रयत्न करुन देखील माझी नजरकैदेतून मुक्तता झाली. खरं म्हणजे, हा माझ्याविरोधातील खटला नव्हता. तर संपूर्ण पाकिस्तानविरोधातील खटला होता.”

काश्मीरला भारतापासून तोडण्याची धमकी देताना हाफिज म्हणाला की, "मी आता भारताला इतकंच सांगू इच्छितो की, भारत मला किंवा काश्मीरचं काहीही वाकडं करु शकत नाही. लवकरच आम्ही काश्मीरला भारतापासून तोडू. आणि मशरिकी पाकिस्तान( बांगलादेश) स्वातंत्र्याचा बदला घेऊ."

दरम्यान, 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानला धूळ चारत, पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. त्यावरुनच शनिवारी एका रॅलीमध्ये हाफिजने बांगलादेशाला स्वतंत्र करण्याच्या, घटनेचा बदला घेण्याचा इशारा दिला.

हाफिजच्या या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियातूनही उमटत आहेत. सोशल मीडिया यूजरने हाफिजच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका यूजरने म्हटलंय की, एकदा पंगा घेतल्याचा परिणाम म्हणून देशाचे दोन तुकडे झाले. आता पुन्हा तसा प्रयत्न केल्यास, देशाचे चार तुकडे होतील असं म्हटलं आहे.


दुसऱ्या एका यूजरने म्हटलंय की, “कुत्री तर भुंकतच असतात. पण हा तर रडत आहे.”



दुसरीकडे भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑल-आऊटमुळे काश्मीरमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यावेळीच पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने हाफिज सईदची नजरकैदेतून मुक्तता करण्याची चाल खेळली आहे. नजरकैदेतून सुटका होताच त्याने भारताविरोधात गरळ ओकण्या सुरुवात केली आहे.