बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं भारताला निर्वाणीचा इशारा दिला आहे. बिजिंगमधल्या राजदुतांच्या परिषदेत भारताने आपली स्थिती समजून घ्यावी, चीन जास्त वाट पाहणार नाही, अशी उघड धमकी चिनी राजदुतांनी दिली आहे.


सध्या डोकलाममधील परिस्थितीवरुन भारत विरुद्ध चीन संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनची राजधानी बिजिंगमध्ये राजदूतांची परिषद सुरु आहे. या परिषदेत चीनने भारताला उघड उघड धमकी दिली आहे.

चिनी मीडियाची आगपाखड

दुसरीकडे चिनी मीडियातूनही भारतविरोधात आगपाखड सुरु आहे. चिनी लष्कराने भारताच्या 158 जवानांना मारल्याचा दावा चिनी मीडियाने केला आहे. चीन सेंट्रल टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) ने याबाबतचा दावा केला आहे. पण भारताना चीनचा हा दावा खोडून काढला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची चिनी मीडियाला खडेबोल

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं की, चिनी माध्यमातून खोट्या बातम्या देण्यात येत असून, जबाबदार माध्यामांकडून शिकलं पाहिजे, असं म्हणलं आहे.

भारताकडून सीमेवरील चौक्यांचं पुनरुज्जीवन

दरम्यान, भारत-चीन सिमेवरील सैन्याच्या निष्क्रिय चौक्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-चीन सिमेवरील चेक पोस्टवर आयटीबीपीचे जवान आणि अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे.

ब्रिक्स परिषदेत भारत-चीन तणावाचे पडसाद

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 26 जुलै रोजी ब्रिक्स देशांच्या एनएसएची बैठक होत आहे. या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही सहभागी होणार आहेत. या बैठकीतही डोकलाम मुद्द्यावरुन द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  पण दुसरीकडे भारताकडून सीमेवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे.