Suez Canal : आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक झाला आहे. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या चिंचोळ्या कालव्यात अडकलं. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली असून जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. महत्वाचं म्हणजे या एव्हरग्रीन जहाजावरील सर्व 25 क्रू भारतीय आहे. 


इजिप्तचा सुएज कालवा म्हणजे समद्रातील 193.3 किमीचा एक चिंचोळा मार्ग. या कालव्यावर सत्ता गाजवण्यासाठी अनेक युध्दं झाली आहेत. सध्या सुएज कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी तसेच अटलांटिक महासागराला हिंदी महासागराशी जोडतो, म्हणजेच आशियाला युरोपशी जोडण्याचं काम करतो.


मंगळवारी सकाळी 7.40 च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. 
त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झाल्याचं पहायला मिळतंय. हा मार्ग आता खुला होण्यासाठी काही दिवस लागतील असं सांगण्यात येतंय.


बुधवारी इजिप्तच्या प्रशासनाकडून कालव्यात हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी आठ टगबोट्सचा वापर करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. 


याच समुद्री मार्गाने रोज जवळपास सरासरी 90 मोठी जहाजं आणि इतर अनेक लहान जहाजं प्रवास करतात. सुएज कालव्यात हे महाकाय जहाज अडकल्याने जगाची तासाला सुमारे 2800 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था थांबलीय. या जहाजाचा मालक जपानी व्यक्ती आहे. त्याला वाटते की शनिवार संपेपर्यंत हा समुद्री मार्ग मोकळा होईल. पण तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग मोकळा व्हायला अजून काही आठवड्यांचा काळ जाण्याची शक्यता आहे.   


या चार दिवसात जवळपास 400 जहाजांची वाहतूक बंद झाली आहे.  हा कालवा ब्लॉक झाल्याने रोज जवळपास सरासरी 9.7 बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक थांबलीय. त्यामध्ये 5.1 बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पश्चिमी देशांची आहे तर 4.6 बिलियन डॉलर्सची वाहतूक ही पूर्वेकडच्या देशांची आहे. या 


हा समुद्री मार्ग जर मोठ्या काळासाठी बंद राहिला तर या जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते आशिया असा प्रवास करावा लागेल आणि ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 


महत्वाच्या बातम्या :