केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरामध्ये सध्या प्रचंड दुष्काळ पडला असून त्याची झळ आता भारतीय संघाला देखील बसत आहे. त्यामुळे यापुढे सराव किंवा सामन्यानंतर फक्त 1 मिनिट ते 90 सेकंदच शॉवर घ्या. अशा सूचना टीम इंडियाला स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


गेल्या तीन वर्षापासून केपटाऊनमध्ये अत्यल्प पाऊस होत असल्याने यंदा इथे मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक व्यक्तीला 50 लीटरपेक्षा अधिक पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधी भारतीय संघ इथे कसोटी सामन्यासाठी आलेला असताना तेव्हा प्रत्येक व्यक्तीसाठी 87 लीटर पाणी वापराची मर्यादा होती. मात्र, आता पाण्याची पातळी आणखी कमी करण्यात आली आहे.

येथे असणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी सध्या प्रचंड कमी झाली आहे. जर पाण्याची पातळी 11 टक्क्यांपर्यंत गेली तर त्यातील पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे येथील प्रशासनासमोर पाणी पुरवठा अतिशय काटकसरीने करण्याचं आव्हान असणार आहे.

केपटाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असल्याने सर्व स्थानिक स्तरावरील क्रिकेट सामने बंद ठेवण्यात आले आहेत. आता इथे फक्त द. आफ्रिका आणि भारतातील आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत हिवाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त कोरडं असलेलं हवामान, भूजलाची घटलेली पातळी, धरणांमधील कमी होणारा पाणीसाठा अशा परिस्थितीचा सामना सध्या केप टाऊन शहराला करावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

केवळ दोनच मिनिटं शॉवर, द.आफ्रिकेत टीम इंडियाला सूचना