बुरहान वाणीला मारल्यानेच हिंसाचार, पाकच्या उलट्या बोंबा
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2017 01:02 PM (IST)
इस्लामाबाद: पाकिस्तानने आपल्या उलट्या बोंबा पुन्हा कायम ठेवल्या असून, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणीला मारल्याने काश्मीर प्रश्नाने वेगळं वळण घेतलं. शिवाय, राज्यातील लोकसंख्या बदलण्यासाठी भारताने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने काश्मीर खोऱ्यातील स्थानिक तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असल्याचं म्हणलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी काश्मीर एकत्रिकरणाच्या दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही बोंब ठोकली आहे. तसेच अजीज यांनी भारतीय सुरक्षा दलाने 8 जून रोजी बुरहान वाणीला मारल्याने काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले, तर काहीजणांना अंशिक रुपांनं अंधत्वही आल्याचा दावा केला. याशिवाय भारत-पाक सीमेवर भारताकडूनच गोळीबार करुन, संपूर्ण जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याने भारताचे नुकसान होत असल्याचा दावा भारत आंतरराष्ट्रीय समुदाया समोर करत असल्याची आरोळी दिली आहे. ते म्हणाले की, ''काश्मीरमध्ये सुरु असलेले तरुणांचे आंदोलन भारत सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न होत आहेत. पण तरुणांचा आवाज दाबला जात नाही आहे. त्यामुळे भारत सरकारच काश्मीरमधील अशांततेला कारणीभूत आहे.'' विशेष म्हणजे, काश्मीर मुद्द्यावरुन युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मानवी हक्क संघटनेच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. या बैठकीनंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी भारतावर दबाव आणला जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.