भारताच्या परराष्ट्र सचिव प्रीती सरन यांनी संमेलनाच्या घोषणापत्राबाबत माध्यमांना माहिती दिली.
ब्रिक्समधील सर्व देश म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी घोषणापत्रात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी प्रीती सरन म्हणाल्या, “दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजुटीने काम करणं आवश्यक आहे. हीच बाब आता सर्वांच्या लक्षात येत आहे. ब्रिक्स देशांचे सदस्य कुठे ना कुठे दहशतवादाचे शिकार होत आहेत. त्यामुळे आता सर्वांना दहशतवादाविरोधात उभं राहण्याची गरज आहे. तुम्ही त्याबाबत दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ब्रिक्स संमेलानात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सर्व देशांनी दहशतवादाची निंदा केली आणि त्याविरोधातील कारवाईवर जोर दिल्याचं प्रीती सरन यांनी सांगितलं.
सरन म्हणाल्या, “ब्रिक्समध्ये पहिल्यांदाच हक्कानी नेटवर्क, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यासारख्या दहशतवादी संघटनांची नावं जाहीर करण्यात आली. जगातील सर्व देशांनी कट्टरतेविरोधात एकजूट होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. त्यासाठी भारत कट्टरतेविरोधात एक जागतिक परिषदेचं आयोजन करेल”