शियामेन : चीनच्या शियामेनमधील ब्रिक्स संमेलनचा आज अखेरचा दिवस आहे. डोकलाम वादानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबाबत सहमती झाली.


पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपति जिनपिंग यांच्या भेटीनंतर पराराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन दोन्ही नेत्यांमधील चर्चेची माहिती दिली.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, "सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमध्ये कोणतेही मतभेद झाले तरी त्याचं रुपांतर वादामध्ये होऊ द्यायचं नाही, यावरही दोन्ही देशांनी पाठिंबा दर्शवला आहे.

परंतु दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस जयशंकर यांनी सांगितलं.

या भेटीत पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स संमेलनासाठी चीनला शुभेच्छा दिल्या. ब्रिक्सला प्रासंगिक बनवण्यासाठी हे संमेलन यशस्वी ठरलं. यामुळे ब्रिक्स देशांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत, असं मोदी म्हणाले.

दोन्ही विकसनशील आणि उदयोन्मुख देश : शी जिनपिंग
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले की, "चीन आणि भारत प्रमुख शेजारी देशत आहेत. दोन्ही विकसनशील आणि उदयोन्मुख देश आहेत. चीन आणि भारताने एकत्र मिळून पंचशील करारा अंतर्गत काम करायला तयार आहेत."

काय आहे डोकलाम वाद?
डोकलाममध्ये चीन आणि भारतीय सैन्यामधील तणावाची सुरुवात 16 जूनपासून झाली होती. भारतीय सैन्याने चीनला डोकलाममध्ये रस्ता बनवण्यापासून रोखलं होतं. भारत आणि चीनने 28 ऑगस्टला आपापलं सैन्य हटवण्याची घोषणा केल्यानंतर सुमारे 73 दिवसांनी हा वाद मिटला.