नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक म्हणजे कलम 370 रद्द करणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकांवर बैठका घेत आहेत. आज त्यांची नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.


याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवणार असल्याचंही म्हटलं. तसेच दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला आहे.


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी एआरवाय न्यूजशी बोलताना म्हटलं की, आमचे उच्चायुक्त नवी दिल्लीत बऱ्याच काळापासून नाहीत. त्यामुळे भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्तांना आम्ही भारतात पाठवणार आहोत. तसेच भारताने जम्मू काश्मीर संदर्भात घेतलेल्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगतलं.





मोदी सरकारने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. तसेच जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जाही संपला आहे.



भारताने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानला पचलेला दिसत नाही. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भारताने कुटनितीचा वापर करत पाकिस्तानला प्रत्येक वेळी मात दिली.


संबंधित बातम्या