वाशीम : महाराष्ट्राच्या  विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार करण्यात आला. समृद्धी महामार्ग घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समृद्धी मार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या कमी होत नाही.समृद्धी महामार्गावर सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.  प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही आपघात थांबत नाही. मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला  धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.


या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी  वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 जवळ हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला  या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे  हा अपघात झाला. 


वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल


या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.


आठ महिन्यांमध्ये 700 हून अधिक अपघात


समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 99 अपघातात 262 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या "महामार्ग सुरक्षा" दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 


समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे


यासंदर्भात महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीप्रमाणे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप आणि तीव्र गतीने वाहन चालवणे (over speeding) हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे  समृद्धी महामार्गावर सर्वाधिक बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे गेल्याचे या अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे 12 अपघात घडले असून त्यामध्ये 44 जणांचा बळी गेला आहे. तर, ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून त्यात 33 जणांचा बळी गेला आहे. टायर फुटल्यामुळे ही चार अपघात झाले असून त्यात 10 जणांचा बळी गेला आहे.


हे ही वाचा :


वाढत्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्त थांबवावी, नागपूर खंडपीठात याचिका दाखल; कोर्ट काय निर्णय घेणार?