वर्धा : वर्ध्यातील (Wardha) मांडवा येथे गावाजवळील मोती नाल्यावरील बंधाराजवळ गणपती विसर्जनाकरता (Ganesh Visarjan) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांचा आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा समावेश आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे..


गणपती विसर्जनाच्या दिवशी वर्ध्यात शोककळा 


आज शुक्रवारी  दुपारी 4 वाजताच्याच्या सुमारास संदीप ज्ञानेश्वर चव्हाण हा युवक त्याच्या घरच्या गणपतीच्या विसर्जन कार्यक्रमाकरता बंधाऱ्यावर गेला होता. भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी होतं अनेक नागरिक त्या ठिकाणी विसर्जनाकरता जमले होते. काही चिमुकले देखील त्या ठिकाणी विसर्जनाचा आनंद लुटत होती. पूजन झाल्यावर गणपती विसर्जनासाठी संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (वय 32 वर्ष ) तसेच त्यांच्या सोबत अथर्व सचीन वंजारी (वय 11 वर्ष ), कार्तिक तुळशीराम बलवीर (वय 11 वर्ष) हे देखील गेले होते. 


बुडताना बघून आरडाओरड 


मुलं पाण्यात बुडत असल्याचे पाहून संदीप हे त्यांना वाचविण्यासाठी गेले. मात्र संदीपला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडला. नाल्यापासून काही अंतरावर असलेल्या नागरिकांना  गणपती विसर्जनासाठी आलेले कोणीतरी बुडत असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली.  बुडणारे व्यक्ती नागरिकांना दिसल्याने त्यांनी धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा या घटनेचा पोलीस तपास करत आहे. घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.