अमरावती : विदर्भात मंगळवार 'घात'वार ठरला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विदर्भात चोवीस तासात विविध अपघातात 11 मृत्यू तर 16 जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रात्री 1 वाजता पुन्हा भीषण अपघात झाला आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. झोप लागल्याने चालक आणि वाहकाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तळेगाव दशासर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तर वर्धा जिल्ह्यात काल सायंकाळी 5 च्या सुमारास दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.


अमरावतीसह वर्ध्यातही अपघात


वर्ध्याच्या आष्टी येथे दुचाकीवर फिरायला जाणाऱ्या तिघांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही अप्पर वर्धा धरण पहायला गेले होते. धरण पाहून दुचाकीने परत येत असताना आष्टी येथे रस्त्याच्या बॅरिकेटस वर दुचाकी धडकली, दुचाकीवरील दोघे तीस फूट लांब फेकले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.


बुलढाण्यात एसटीला अपघात


तिसरा अपघात बुलढाणा जिल्ह्यात झाला. सवणा ते चिखली एसटी बसचा अपघात आज सकाळी सात वाजेदरम्यान झाला. स्टिअरिंग रोड लोक झाल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात दहा ते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये साधारण विद्यार्थ्यांसह 25 प्रवाशी प्रवास करत होते.


यवतमाळमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू


यवतमाळच्या वणी तालुक्यात वर्धा नदीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे वास्तव्यास असलेले 5 तरुण जुनाड येथील वर्धा नदीच्या पुलावर बसले होते. त्यातील दोघांनी पोहण्यासाठी नदीत उड्या मारल्या मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेले. तर, दुसऱ्या घटनेत वणीच्या नायगाव येथे वर्धा नदीपत्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे वाहून गेले. यातील एकाचा कोना शिवारात मृतदेह तर दुसऱ्याचा मृतदेह माजरीजवळ आढळून आला. 


गोंदियामध्ये तिघांचा मृत्यू


गोंदिया जिल्ह्यातील फिरायला गेलेल्या तिघांचा एका तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मनगट्टा गावात घडली आहे. मृतक तिघेही शिक्षक हे गोंदियात एका कोचिंग क्लास मध्ये शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.