- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.
संप कायम, 5 जूनला महाराष्ट्र बंद, संपकरी शेतकरी आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2017 05:12 PM (IST)
A
अहमदनगर : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद राहिल. 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरातील शेतकरी संपावर राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे. संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?