उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद
उल्हासनगरमध्ये 78 जागांसाठी 482 उमेदवार
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2017 12:38 PM (IST)
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या 78 जागांसाठी 482 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तब्बल 79 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात लढत आहेच, पण दोन्ही पक्षांना स्थानिक साई पक्षाचं कडवं आव्हान आहे. याशिवाय विशिष्ट प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, रिपाइं, भारिप, बसपा आदी पक्षांचंही वर्चस्व आहे. यावेळी उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी भाजपला साथ दिली आहे. टीम ओमी कलानी सोबत आल्याने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र ओमी कलानींचा अर्जच बाद झाला आहे. भाजपचे नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप आणि कलानींच्या एकूण 70 उमेदवारांना कमळ तर टीमच्या 4 जणांना रासप पक्षाचे नगारा चिन्हे दिले. रिपाइं आठवले गटाच्या लता निकम, पीआरपीचे प्रमोद टाले, शारदा अंभोरे तर एका अपक्षाला भाजप पुरस्कृत केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी साई पक्षाच्या तिकिटावरुन रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ओमी टीममधील मोहन कंडारे, त्रिलोकाणी, पंडित निकम, विकास खरात यांच्यासह अनेक राष्ट्रवादी आणि साई पक्षाला जवळ करून रिंगणात उतरले आहेत. शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील, नगरसेविका समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रभाग क्र-२० मधील तिन्ही उमेदवार सुरक्षित झाले. भाजपा-साई पक्षाने मराठी उमेदवार रिंगणात उतरवून रंगत वाढविली आहे. साई पक्षाने 59 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये प्रमुख जीवन इदनानी आणि माजी महापौर आशा इदनानी यांनी दोन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीचे 42, साई पक्षाचे 59, भारिपचे 12, मनसे 23, बीएसपीचे 22 आदीसह 479 उमेदवार रिंगणात आहेत आहेत. संबंधित बातम्या