Uddhav Thackeray in Dharavi : सबका साथ सबका विकास नाही तर  'सबका साथ मित्र का विकास', असं सध्या सुरु आहे. मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून केला जात आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. ते धारावी येथील सभेत बोलत होते. 


'अडाणींसाठी मुलुंडच्या मिठागरांची जागा देऊन टाकली'


उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत आपण अनेकदा मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. मात्र, केंद्र सरकार न्यायालयात गेले होते. तुमची जागा की आमची जागा असे सुरु होते. ती जागा आम्हाला नकोय आमच्या लोकांसाठी पाहिजे. नाही ही फक्त आमची जागा असे बोलले जात होते. तिथे मिठागर आहे. कांजूरला पण मिठागर आहे. त्यांनी जागा दिली नाही. मी मुख्यमंत्री म्हणून कांजुरमार्गची जागा मागत होतो तेव्हा दिली नाही. मात्र, पंतप्रधानांच्या मित्रासाठी, अदाणींसाठी मुलुंडच्या मिठागरांची जागा देऊन टाकली. हा यांचा सबका साथ आणि सबका विकास आहे. साथ सर्वांची हवी मात्र, विकास माझ्या मित्रांचा होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 


कोरोना धारावीत आला तेव्हा दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता


पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  माझी धारावीकर येथून कोठेही जाणार नाहीत. धारावीकरांना विकास पाहिजे आणि तो इथल्या इथेच पाहिजे. तुम्हाला हे सोपे वाटत असेल की, घरे बांधेपर्यंत मिठागरात जागा दिली. पण एकदा का तुम्ही मिठागरात गेला की, परत तुम्हाला धारावी दिसणार नाही. ही जागा दुसरे-तिसरे कोणाच्या नाहीतर अडाणींच्या घशात घातली जाणार आहे. म्हणजे धारावी तर गेलीच आणि मिठागर देखील गेले. तुम्ही तिथे किती दिवस राहणार? तुम्हाला सोयी तर काय मिळणार?  सध्याचे उपमुख्यमंत्री , पंतप्रधान कधी तरी तुमच्या भेटीला आलेत का? पण आता दिसतील. आता त्यांना माहिती आहे की, धारावीमध्ये कोरोना नाही. कोरोना काळात काय होते? तेव्हा दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता. तेव्हा म्हणत होते उद्धवजी काहीतरी करा. मी म्हटलं चिंता करु नका. मी सांगत होतो घराबाहेर पडू नका. धारावीत एका घरात 8 -10 लोक राहतात, असेही या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. 


धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे


माझ्या धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. विकास आम्हाला पण पाहिजे. पण तुम्ही इकडी कोंडवडा करुन अडाणीच्या घशात पैसा घालणार आहात. मुंबईतील सर्व उद्योगधंदे ओरबाडून घेऊन जात आहेत. आता त्यांना ते कमी पडतय म्हणून ते अख्खी धारावी ते अडाणीच्या घशात घालायला निघाले आहेत, असा दावाही ठाकरे यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Zeeshan Siddique : पक्ष सोडला नाही, पण झिशान सिद्दीकींनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली, म्हणाले...