मुंबई : पुण्यातील माळीण दुर्घटनेची आठवण करुन देणारी, दु:खाचा डोंगर कोसळावी तशी दुर्घटना केरळमधील वायनाडमध्ये (Waynad) घडली. येथील भूस्सखलनाच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 200 हून अधिक जणांना जीव गेला असून अद्यापही येथे शोधमोहिम सुरू आहे. वायनाडचे लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही तात्काळ येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली. येथील चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचा आणि मजबूत लोखंडी पूल सैन्यातील जवानांकडून (Indian Army) बांधण्यात येत आहे. या पूल बांधणीच्या कामाचं नेतृत्व महाराष्ट्राचील लेक आणि सैन्य दलातील अधिकारी सीता शेळके करत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन, हा पूल मजबूत होण्यासाठी त्या झटत असल्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.


केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब आणि कित्येक संसार ढिगाऱ्याखाली दबली गेली. या घटनेनं देश हळहळला. त्यानंतर, सुरू झाला तो अश्रू पुसून पुन्हा नव्याने उभं राहण्याचा संघर्ष, पुन्हा लढायचं आणि पुन्हा उभं राहायचं हा मंत्र घेऊन वायनाडमधील जनता, सरकार आणि प्रशासन कामाला लागलं. तेव्हा या सर्वांच्या मदतीला धावून आली आपली इंडियन आर्मी. येथील चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता. आता, हे पूल बनवण्याचं काम भारतीय सैन्य दलाच्या मद्रास सॅपर्स पथकाने हाती घेतलं आहे. विशेष म्हणजे या पथकाचं नेतृत्व करणारी लेक महाराष्ट्राची आहे. 


मेजर सीता शेळके यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात अथक परिश्रम करत सहकार्यांच्या मदतीने नदीवर तब्बल 190 फुटांचा हा पूल उभारण्याचं काम केलंय. मद्रास सॅपर्स या पथकाने केवळ 31 तासात मातीचा ढिगारा, मुळापासून उखडलेली झाडे बाजूला सारत वाहत्या नदीवर पूलाचे निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, निसर्गकोपामुळे चुराल्लमाला, मेप्पडी आणि मुंदाक्काईमधील नागरिक प्रचंड धक्क्यात होते. तशाच स्थितीत ते अनेक तास प्रियजनांना शोधत होते. या पूरस्थितीत तेथील ग्रामस्थांना धीर देण्याचं कामही भारतीय सैन्यांकडून होत आहे.


मला फक्त महिला समजू नका


''मी एकमेव महिला अधिकारी येथे आहे, असे अजिबात समजू नका. मी सैनिक आहे. मी इथे भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करत आहे आणि मी या बचाव कार्यात काम करणाऱ्या पथकाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो'', असे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सीता शेळके यांनी म्हटले. तसेच, हा पूल बांधण्याचे श्रेय फक्त लष्कराचे नाही. तर इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. अनेक यंत्रणांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. मी स्थानिक यंत्रणा, राज्य सरकारचे अधिकारी आणि ठिकठिकाणाहून मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करते. विशेष करून आजूबाजूच्या ग्रामस्थांचे धन्यवाद मानले पाहिजेत, त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य अवघड होते,'' असेही त्यांनी म्हटले. 


कोण आहेत सीता शेळके


मेजर सीता अशोक शेळके या मुळच्या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. मद्रास सॅपर्स या नावाने ओळख असलेल्या पथकात त्या अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हे पथक लष्करासाठी पूल तयार करण्याचे काम करते. युद्धादरम्यान तात्पुरते रस्ते तयार करणे, भूसुरुंग शोधून तो नष्ट करणे, अशी कामे या पथकाकडून केली जातात. तसेच नैसर्गिक आपत्ती आली असताना बचाव कार्यातही हे पथक योगदान देते. केरळमध्ये 2018 साली आलेल्या पूरातही या पथकाने बचाव कार्य केले होते. लष्कराच्या बंगळुरूमधील 'मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप'मधील 70 जवानांच्या पथकातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत.


हेही वाचा


पुणे अन् सातारकरांना रेड अलर्ट, मोठ्या प्रमाणावर धरणातून विसर्ग; अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन