Hair Care: जेव्हा आपण अंघोळ करतो, तेव्हा आपण साबण (Soap) आणि शॅम्पूचा (Shampoo) वापर करतोच. शरीर स्वच्छ करण्यासाठी, अंग धुण्यासाठी साबणाचा वापर केला जातो. तर केसांमधील घाण साफ करून ते सिल्की बनवण्यासाठी, केसांची निगा राखण्यासाठी (Hair Care) शॅम्पूचा वापर केला जातो. या कारणासाठीच तुम्हीही केसांना शॅम्पू लावत असाल. पण जगात अशीही व्यक्ती आहे, जी कधीच केसांना शॅम्पू लावत नाही. याचे केसांवर आश्चर्यकारक परिणाम देखील पाहायला मिळाले.


सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत 7 वर्षांपासून केसांना एकदाही शॅम्पू लावला नसल्याचं या व्यक्तीने सांगितलं. हा व्हिडीओ पाहून, असं कसं घडू शकतं? असा प्रश्न अनेकांना पडला.


का घेतला शॅम्पू वापरणं बंद करण्याचा निर्णय?


लॅडबाइबल (Ladbible) वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 7 वर्षं शॅम्पूशिवाय राहिल्यानंतर डोक्यावर आणि केसांवर काय परिणाम झाला? हे या व्यक्तीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जेव्हा हा व्यक्ती नियमितपणे अँटी-डँड्रफ शॅम्पू (Anti-Dandruff Shampoo) वापरत होता, तेव्हा त्याची टाळू कशी दिसत होती? हे देखील त्याने व्हिडिओमधून दाखवलं आहे


पूर्वी जेव्हा हा माणूस शॅम्पू वापरायचा, तेव्हा त्याची टाळू खूप सुजलेली आणि कोरडी दिसत होती आणि संपूर्ण माथ्यावर डाग पडले होते. त्याच्या डोक्यात एक अतिशय विचित्र प्रकारचा संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्याचं डोकं विचित्र दिसत होतं. या गंभीर समस्येतून लवकरात लवकर सुटका व्हावी, या उद्देशाने त्याने केसांना शॅम्पू लावणं पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला.


अन् त्याचा निर्णय योग्य ठरला


एडन असं या व्यक्तीचं नाव असून तो पुढे म्हणाले की, शॅम्पू सोडण्याचा त्याचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं सिद्ध झालं. एडनला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले. शॅम्पू वापरणं बंद केल्यापासून त्याच्या टाळूवरील संसर्ग दूर झाला आणि डोक्यावरील लाल डाग देखील नाहीसे झाले.


इतकेच नाही तर त्याचे केस पुन्हा वाढले आणि केस पूर्वीपेक्षा निरोगी आणि चांगले होते. केसांवर होणारे चांगले परिणाम पाहून एडनने शॅम्पू वापरणं पूर्णपणे सोडलं. आता तो आठवड्यातून एकदा थंड पाण्याने केस धुतो. याशिवाय तो केसांवर इतर कोणताही प्रयोग करत नाही.


शॅम्पू न वापरल्यास काय परिणाम दिसतात?


एडनने पुढे सांगितलं, 'अनेकांना भीती वाटते की त्यांनी शॅम्पू वापरणं बंद केलं तर त्यांचे केस चिकट होतील, तर तसं अजिबात नाही. मुळात, जेव्हा तुम्ही शॅम्पू वापरता, तेव्हा तुम्ही तुमच्या टाळूचं नैसर्गिक तेल काढून टाकता, ज्याला सेबम म्हणतात. नंतर तुमची टाळू गरजेपेक्षा अधिक तेल तयार करते.' त्यामुळे एडनने लोकांना शॅम्पू न वापरण्याचा पर्याय अवलंबण्याचा सल्ला दिला आहे.


हेही वाचा:


World News: सुंदर ओठांसाठी केला 51 लाखांचा खर्च अन् झालं भलतंच; आता लोक म्हणू लागले 'चेटकीण'