Tansa Sanctuary Fire : ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा (Tansa Sanctuary Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. अचानक वणवा लागल्याने परिसरातील अनेक वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास हा वणवा लागल्याची घटना घडली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्यानं नियंत्रण मिळवता आले नाही. 


अनेक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका


दरम्यान, वन विभागाचे कर्मचारी संपावर असल्यामुळं वणव्याची दाहकता वाढून संपूर्ण अभयारण्य आगीत सापडण्याची दाट शक्यता आहे. ही आग रात्री उशिरापर्यंत सुरु असल्यानं जंगलातील अनेक झाडांचे नुकसान झालं आहे. तसेच अनेक वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 


आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ


जंगलाला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. दरवर्षी आग लागून हजारो झाडांचे नुकसान होण्याचा प्रकार घडत आहेत. मात्र, वनविभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे नागरिकांनी महटलंय. आग लागल्यानंतर ग्रामस्थ कोणत्याही अग्निशमन साधनशिवाय आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी वनविभागाशी तात्काळ संपंर्क न झाल्याने आगीचे रूपांतर वणव्यात होते. परिणामी अधिक नुकसान होते. एकीकडे जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम करायचे, याला अर्थ नसल्याची चर्चा आहे. त्यामुळं आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मानवी हस्तक्षेपामुळे वणवे लागण्याचे प्रकार अधिक असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Jogeshwari Fire News : मुंबईच्या ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला लागलेली आग आटोक्यात, 20 ते 25 दुकानं जळून खाक