ठाणे: मलंगडाबाबत (Malang Gad) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेलं आश्वासन ते नक्कीच पूर्ण करणार, जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील असं आश्वासन शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिलं. श्रीमलंगडाची मुक्ती लवकरच करणार असं आश्वासन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. 


कल्याण तालुक्यातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाच्या दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वारकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या मनामधील  मलंगडाबद्दलची इच्छा बोलून दाखवली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनातली इच्छा, आकांक्षा आहे ती पूर्ण होतील. अफजलखानाचा कोथळा महाराष्ट्रात दोन वेळा काढण्यात आला, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दुसऱ्यांदा प्रतापगडावरील अतिक्रमण काढून या सरकारने त्याचा कोथळा काढला. धर्माचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहोत, तुमच्या माध्यमातून आपला धर्म, आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे काम सुरू आहे. 


गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग (Haji Malang Dargah) किंवा मलंगडाचा वाद सुरू आहे. यासंदर्भात  संशोधन सुरू आहे आणि दोन्ही धर्मियांकडून वेगवेगळे दाखले देखील दिले जातात. या जागेचा उल्लेख हाजी मलंग, मलंगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतो. गेली अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा, आंदोलन आणि वाद सुरू आहेत. त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.


श्रीमलंगड की हाजी मलंग, वाद काय आहे?


श्री मलंगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते, नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे 13 व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ ​​मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू सांगते. 


दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 80 च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे


ठाणे जिल्ह्यातील मलंगड येथे असलेल्या प्रार्थनास्थळाला दर्गा म्हणायचे की समाधी यासंदर्भातील न्यायालयीन वाद अद्याप प्रलंबित आहे. तो वाद मिटल्याची कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. मात्र आजही श्रीमलंगड की हाजी मलंग यावरून हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये वाद सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमलंगड हरिनाम सप्ताहात मलंगड मुक्ती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं आश्वासन दिले. त्यामुळे पुढील काळात यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.


ही बातमी वाचा: