Raj Thackeray on MNS Toll Agigation: टोल दरवाढीवरुन (Toll Agigation) मनसे (MNS) आक्रमक झाली असून आता त्यासाठी मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार असून हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहेत. तसेच, गेल्या 4 दिवसांपासून टोल दरवाढीविरोधात उपोषण करणाऱ्या अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना उपोषण मागे घेण्याच्या सूचनाही राज ठाकरेंनी दिल्या आहेत. राज ठाकरे आज स्वतः ठाण्यात अविनाश जाधव ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, तिथे गेले आणि त्यांनी अविनाश जाधवांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "ठाण्यातील टोलनाक्यावर जी दरवाढ झालीये, त्याविरोधात अविनाश जाधवसह काही इतर मंडळी उपोषणाला बसली होती. मी अविनाशला काल फोन करुन सांगितलं की, हे उपोषण वैगरे आपलं काही काम नाही. मी उद्या सकाळी येतो. तुम्हाला आठवत असेल तर मनसेनं टोलसंदर्भात अनेक आंदोलनं केली. राज्यभरातील अधिकृत आणि अनधिकृत 65 ते 67 टोलनाके आम्ही बंद केले. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचा ज्यावेळी त्यांचा जाहीरनामा आलेला, त्यात त्यांनी जाहीर केलेलं आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. 2014 आणि 2019 लाही त्यांनी हेच सांगितलं होतं. पण त्यांना कधी कोणी विचारत नाही, मला मात्र प्रत्येकवेळी विचारलं जातं टोल आंदोलनाचं काय झालं?" तसेच, अविनाश जाधवांना आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं


सरकारी भाषा अतिशय घाणेरडी : राज ठाकरे 


"अनेक वर्षांपासून सुरू झालेल्या आंदोलनात पुन्हा दरवाढ झाली. यासंदर्भात मोपलवारांशी माझं बोलणं झालं होतं. मोपलवार म्हणाले की, यासंदर्भात ॲग्रीमेंट झालं आणि पैसे उचलले गेले होते. मला त्यांनी काल एक नोटही पाठवली आहे. यामध्ये 2020 ते 2023 दोन स्तंभ यात दिलेले आहेत. वाहनांचा प्रकार आणि प्रति फेरीचे दर, दोन चाकी आणि तीन चाकीला पथकर नाही. तर कार, जीप, 12 प्रवासी क्षमता असलेल्या गाड्या आता 40 ऐवजी 45 रुपये, असं लिहिलेलं आहे. एकतर सरकारी भाषा अतिशय घाणेरडी असते. माझ्यावर गुन्हे दाखल झालेले, तेव्हा माझ्याकडे पेपर यायचा, त्यावेळी मला हेच कळायचं नाही की, धरला आहे की सोडला आहे.", असं राज ठाकरे म्हणाले. 


टोलबाबत एकनाथ शिंदेंनी पिटिशन केलेली, त्यांनी का मागे घेतली? राज ठाकरेंचा सवाल 


यात पेडर रोडचा फ्लाय ओव्हरचा रस्ता आहे. त्याचे पैसे पण घेतले जात आहे मात्र तो तयारच झालेला नाही आहे त्याचे प्रकरण तुम्हाला माहिती आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. टोल का लागू केला जात आहे? हे पैसे जातात कुठे? हे सगळे टोल म्हैसकर यांच्याकडे आहेत, हे कोण आहेत म्हैसकर? माझी माहिती चुकत नसेल तर, एकनाथ शिंदे यांनी पिटिशन केलं होतं. त्यांनी ते मागे घेतलं? का मागे घेतलं? कोणी मागे घ्यायला लावलं? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मला लोकांचे पण नवल वाटतं? टोल भरायचा आनंद येतो का त्यांना? मुख्यमंत्र्यांसमोर मी या सगळ्या गोष्टींसंदर्भात मी भेट घेईल. निवडणुका तोंडावर आहेत, लोकांचा राग त्यांना पण परवडणारा नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय. 


अविनाशला मी उपोषण मागे घ्यायला लावलं आहे, या लोकांसाठी जीव ओवाळू नकोस. यांना काही फरक पडत नाही, एक माणूस मेल्याचा... पण मला आता अनेक सोसायटीचे लोक मला भेटले. येत्या दोन ते तीन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, सगळं सविस्तर त्यांच्यासमोर मांडीन. त्यानंतर तुम्हाला सांगीन की या टोल आंदोलनाचं पुढे काय होणार? असं राज ठाकरे म्हणाले आहेत.