कल्याण: पुष्पक एक्सप्रेसमध्ये संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून आले. पुष्पक एक्स्प्रेस मधील महिलासाठी राखीव असलेल्या बोगीत पुरुष प्रवाशांचा वावर वाढला असल्याने  महिला प्रवाशाने लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करत संताप व्यक्त केला. या तक्रारीनंतर कल्याण रेल्वे स्थानकातील आरपीएफ पथकाने त्या महिला बोगीतील पाच पुरुष प्रवाशांवर  कारवाई करून त्यांना अटक केली आहे. 


लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस मध्ये 22 जून रोजी महिला प्रवाशांच्या बोगीत पुरुष प्रवाशी प्रवास करत होते. सोनाली गुजराथी  नावाची महिला त्याच बोगीतून प्रवास करीत होती. त्यावेळी बोगीत  बसलेल्या पुरुष प्रवाशांना महिला प्रवाशांनी विनंती केली.  तुम्ही बसलात ठीक आहे, मात्र महिलांना बसण्यासाठी जागा द्या अशी महिला प्रवाशांनी पुरुष प्रवाशांना विनंती केली. मात्र या पुरुष प्रवाशांनी महिलांना आरेरावी करण्यास सुरुवात केली. ही बोगी महिलांसाठी राखीव आहे तुम्ही जनरल बोगीमध्ये जा असंही त्यांना सांगितलं. मात्र त्यांना जागाही दिली नाही आणि जनरल बोगीतदेखील ते प्रवासी गेले नाहीत. हा सगळा घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या  सोशल मीडिया ग्रुपवर त्या महिला प्रवाशांनी टाकला. विशेष म्हणजे या महिला बोगीत पुरुष फेरीवाल्यांचादेखील वावर असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत होतं. 


दरम्यान, महिला बोगीत महिला पोलीस कर्मचारी ड्युटीवर नव्हते. नाशिकवरून पुष्पक एक्सप्रेस निघाली त्याच वेळी आरपीएफच्या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये पुरुषाच्या आरेरावीचा हा व्हिडीओ महिला प्रवाशांनी अपलोड करुन  या घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे पुष्पक एक्सप्रेस इगतपुरीला आली असता  प्लॅटफॉर्मवर पोलीस उभे असताना पोलिसांचे  महिला राखीव बोगीकडे  लक्ष गेले. तरीदेखील पोलीस त्या बोगीकडे  आले नाही. तर  महिला प्रवासी सोनाली यांनी एका महिला  पोलीस कर्मचाऱ्याला आवाज देऊन  हात केला.  मात्र ती महिला पोलीस मोबाईल फोनवर बोलण्यास मग्न होती.


दरम्यान दोन तासांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस आल्यानंतर फलाटावर  असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, बोगीमध्ये पुरुष प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढा. एकीकडे  महिला सुरक्षेचा दावा केला जातो मात्र दुसरीकडे अशा घटना घडूनही पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं मत सोनाली गुजराथी यांनी व्यक्त केले. दोन तासापूर्वी  व्हिडीओ रेल्वेच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


त्यानंतर  आरपीएफ कर्मचारी आणि अधिकाऱ्यानी तात्काळ कल्याण रेल्वे  स्टेशनवर धाव घेतली. रात्रीच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्टेशनवर येताच महिला बोगीतील  पुरुष प्रवाशांना  ताब्यात घेत कारवाई केली. तर आरपीएफला पाहून डब्यातील काही पुरुष प्रवाशानी पळ काढला होता. यावेळी महिलांच्या डब्यांमधील सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी देखील महिला प्रवाशांनी केली. 


रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी  लता आरगडे यांच्याशी संपर्क  साधला असता  महिलांच्या  बोगीत आसन व्यवस्था आधीच कमी असते, त्यामध्येही  पुरुष महिला बोगीत शिरतात, मग त्यावेळी  संबंधित आरपीएफ,  जीआरपीएफ यंत्रणा काय करते? असा सवाल त्यांनी केला.  विशेष म्हणजे  प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत अशा घटनांमुळे  आमच्या महिलांची सुरक्षितता धोक्यामध्ये आहे. सर्वसाधारण डब्यामध्ये देखील महिलांवर अत्याचार होतात. महिला डब्यांमध्ये आरपीएफ पोलीस कोणीही नसतात. जर महिलांवरती अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही कोणावरती सोपवणार? रस्त्यांवर गर्दीच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी प्रशासन काय करत आहे? महिला सहप्रवाशांनी आज प्रकार सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये टाकल्यामुळे आरपीएफच्या जवानांनी कल्याण स्टेशनवर जाऊन कारवाई केल्याचे लता आरगडे यांनी सांगितले. 


आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश कुमार सिंग याच्याशी संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले की, लखनौवरून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये लेडीज कोचमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळाली. कल्याण स्टेशनवरती एक्सप्रेस पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी तपासणी केली त्यामधील महिलांसोबत असलेल्या प्रवाशांना इतर डब्यामध्ये बसवण्यात आले. मात्र ज्यांच्या सोबत महिला प्रवासी नव्हत्या अशा पाच प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात हजर केले. आता त्यांची जामीनवर सुटका झाली आहे.