ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांकडून (Police) एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून तातडीने सुनावणीही देखील सुरू झाली आहे. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, याप्रकरणी त्यांच्या समाजातील रितीरिवाजाप्रमाणे आपण अक्षयचा अंत्यविधी करताना त्याचा मृतदेह जाळण्याऐवजी दफन करण्याचं ठरवल्याचं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत आरोपी अक्षयचा (Akshay shinde) दफन विधी होणे अपेक्षित होते, पण अद्याप दफन विधी का झाला नाही, असा सवाल उपस्थित करत वकील अमित कटारनवरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. 


अक्षय शिंदेच्या आई वडिलांना चौकशीसाठी पोलिस घेऊन गेले असून अक्षयच्या वडिलांचा फोन बंद असल्याची माहितीही वकिलांनी दिली. अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. तुम्ही कसा अंत्यविधी करतात ते आम्ही बघतो, असा दम दिला जात असल्याचे मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचे वकिल कटारनवरे यांनी म्हटलं आहे. तसेच, तिकडचे डीसीपी, लोकल ऑथोरिटीशी बोलतील आणि त्याच्या अंत्यविधीचा निर्णय ते घेतील, असे सरकारी वकील विनय रावकर यांनी न्यायालयात बोलताना म्हटल होते. मात्र, आता जी माहिती मिळत आहे, त्यानुसार अक्षयच्या वडील-आई यांना पोलिसांनी बोलवले आहे. पोलीस कॉन्स्टेबलशी बोललो तर, सिनिअर साहेबांनी बोलावलं आहे, चौकशीसाठी घेऊन चाललोय, असे सांगण्यात आल्याचे वकिलांनी म्हटले. 


एवढ्या रात्री एका महिलेला पोलीस घेऊन जात असतील, ज्यांचा मुलगा वारला आहे. पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत का, असा सवाल वकिलांनी विचारला. तसेच, अक्षय शिंदे यांच्या वडिलांचा कॉल लागत नाही, बदलापूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असल्याची माहिती आहे. अक्षयच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह दफनच करायचा आहे, कोर्टामध्ये देखील त्यांनी तसं सांगितला आहे. सरकार पण म्हणाले आहे आम्ही लोकल ऑथॉरिटीशी बोलून स्टॅन्ड घेणार आहोत, संध्याकाळपर्यंत हे होणं अपेक्षित होते. मात्र, आत्तापर्यंत बॉडी का हवाली केली नाही, हे समजत नाही. जमीन त्यांनी द्यावी, बॉडी आम्ही दफन करू ही आमची विनंती सरकारने मान्य केली आहे. अंत्यविधी आतापर्यंत होणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी आतापर्यंत शिंदे कुटुंबीयांना बॉडी देखील दिली नाही, ही जबाबदारी पोलिसांची आहे, असेही वकील अमित कटारनवरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 


हेही वाचा


मुंबईत अतिमुसळधार! रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं, लोकल आणि एक्सप्रेस गाड्या बंद; प्रवाशांची स्टेशनवर गर्दी