मुंबई : शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला असून भांडुप ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्या या काही वेळआपासून बंद आहेत. तशा प्रकारची घोषणा दादर स्टेशनवर करण्यात आली आहे. पावसामुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय.


मुंबईत आज दिवसभर पावसाची हजेरी आहे. संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकल सेवेवर झाल्याचं दिसलं.मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे तर पश्चिम रेल्वे 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.  


घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. गेल्या तासाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचलं आहे.


दरम्यान मुंबईत उद्याही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शहर आणि उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 


अंधेरी, गोरेगावमध्ये पावसाची बॅटिंग


मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली,दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मुसळधार पाऊस पडला. मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याचं दिसतंय.


मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईला देण्यात आलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर  मुंबई महापालिका आयुक्तांनी सर्व उपयुक्तांना, वॉर्ड अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी  आणि कर्मचाऱ्यांनी  नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून तातडीने आपल्या वॉर्डमध्ये  मुसळधार पावसामुळे काही अडचणी येत असतील तर त्या सोडवाव्यात. सर्व उपयुक्तांनी  आपल्याकडे दिलेल्या झोनमध्ये होत असलेल्या कामांवर आणि येत असलेल्या अडचणींवर विशेष लक्ष ठेवावे. जिथे जिथे पाणी साचत असेल तिथे पंपाने पाण्याचा निचरा तातडीने करण्यास  उपाययोजना कराव्यात. त्याशिवाय काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तातडीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रात्रभर काम करावे व आपल्या कार्य कक्षेत विशेष लक्ष ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.