ठाणे: भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून आतापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. 2014 मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना भाजपने अच्छे दिन अशी घोषणा केली. हे अच्छे दिन कधीच नागरिकांना पाहायला मिळाले नाहीत असाही हल्लाबोल त्यांनी केला. ठाण्यातील बैठकीनंतर शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचाराचे आहेत. या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे. 2014 साली यांनी अच्छे दिनची घोषणा यांनी केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. पुन्हा 2019 साली यांनी न्यू इंडिया अशी घोषणा केली ती पूर्ण झालेली नाही. आता 2024 साला साठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी घोषणा देण्यात येतेय. त्याची पूर्तता होतेय का हे पाहणं महत्त्व आहे.


देशातील 44 टक्के लोकांना अद्याप वीज नाही 


शरद पवार म्हणाले की, 2022 पर्यंत प्रत्येकाला 24 तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण केलेलं नाही. 44 टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जी आश्वासनं देण्यात आली ती पाळली गेली नाहीत.


मोदींच्या राज्यात महिलेवर अन्याय 


भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, गुजरात मध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामधे सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली आणि आता गुजरात सरकारने त्यांना सोडलं आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदी यांचं 15 ऑगस्टच भाषण ऐकल, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले, मात्र त्यांच्यांच राज्यांत एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आलं आहे


राज्याचा दौरा करणार 


मी ठाण्यात बैठकीसाठी अलो होतो. माझा प्रयत्न असा राहणार आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्यांची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे. 


कुणाच्या मागे ईडी लावता येईल का याचा प्रयत्न 


कुणाच्या पाठी ईडी, सीबीआय लावता येईल का याचा प्रयत्न करण्यात येतोय. ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही त्या ठिकाणी कारवाई होताना पहायला मिळतंय. विरोधी पक्ष जर सत्तेत असतील तर त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार नव्हतं. परंतु काही आमदार सोबत घेऊन सरकार बनवलं. महाराष्ट्रात देखील असं झालं. मध्यप्रदेशमध्येही हेच झालं.