कल्याण: मला अजितदादांसारखं व्हायचं नाही, मी राजकारणात नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी आलोय असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  (Rohit Pawar) यांनी सांगितलं. एमपीएससी (MPSC) पेपर फुटीवर राज्य सरकार कोणतीच कारवाई करत नाही हे आश्चर्चकारक असल्याचंही ते म्हणाले. रोहित पवार हे आज कल्याणमध्ये होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिली. 


राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका केली होती. कितीही जन्म घेतले तरीही रोहित पवार हे अजित पवार होऊ शकणार नाही असं सुनील तटकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, मला अजितदादांसारखं व्हायचं नाही. अजित पवार हे मोठे नेते आहेत. मी राजकारणात आलोय ते नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी. 


शून्य आमदार, खासदार असतानादेखील नव्या चेहऱ्यांना जनता निवडून देईल असा विश्वास शरद पवारांना आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले. शिवसेनेच्या 16 आमदारांचा निकाल न्यायालयाच्या माध्यमातून केला जाईल असा प्रयत्न भाजपकडून केला जातोय असंही ते म्हणाले.


रोहित पवार म्हणाले की, तीन महिन्यापूर्वी जेव्हा पवार साहेबांना तुमच्या बरोबर किती आमदार आणि खासदार आहेत हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं की माझ्याबरोबर शून्य आमदार आणि खासदार आहेत. म्हणजेच आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राचे नागरिक महत्त्वाचे आहेत, कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनता नवीन चेहरे निवडून देतील असा विश्वास आदरणीय पवार साहेबांना आहे.  


रोहित पवार महाविकास आघाडीत असताना भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते असं आमदार सुनील शेळकेंनी वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिय देताना रोहित पवार म्हणाले की, आमच्या त्या भागातले जिल्ह्याचे प्रवक्ते जे असतील ते त्याला उत्तर देतील. मी माझा वेळ येथे वाया घालवणार नाही. 


भाजपने शरद पवारांना डिवचले, आता काय होईल ते बघा


रोहित पवार म्हणाले की, सन 2019 ला भाजपने कोणत्याही घटक पक्षांना विचारात घेतले नव्हते. आता 2024 सालच्या निवडणुकीसाठी घटक पक्षांच्या बैठका घेत आहेत. कारण भाजप 'इंडिया'ला घाबरलेय. इंडियाकडे 250 खासदार आहेत. भाजपकडे 1664 आमदार आहेत तर इंडियाकडे 1700 च्या आसपास आमदार आहेत. सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीचे 28 खासदार निवडून येणार आहेत. भाजपने महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी शिवसेना फोडली. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीला फोडले, कुटुंब फोडले. शिंदेंना सत्तेत घेतल्यानंतर देखील सर्वेनुसार आकडा बसत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी फोडली. शरद पवार याना डिवचले, आता काय होईल ते बघा. 


ही बातमी वाचा: