ठाणे : मीरा भाईंदर येथे डंपरखाली येऊन एका डिलिव्हरी बॉयचा अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. अपघाताची ही घटना ताजी असतानाचा आता मुंब्रा (Thane) येथील गावदेवी बायपास येथे कंटनेरच्या अपघातात तीन तरुण मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील बायपासवरुन जाणाऱ्या मोठ्या कंटेनरखाली येऊन 3 स्थानिक मुलांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली होती. तर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
आपल्या बाईकवरुन ही मुले कामानिमित्त बाहेर चालली होती, त्यावेळेस कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रवीण पवार यांनी अपघातस्थळी मुंब्रा पोलीस स्टेशन, मुंब्रा फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ॲम्बुलन्स यांना त्वरीत बोलून मदत कार्य सुरू केले. अपघातात मृत्यूमुखी पडलेली तीनही मुले 18 ते 23 वयोगटातील असल्याची माहिती असून अफजल मोईनुद्दीन हसन हा दुचाकीस्वार होता. आपल्या ॲक्सिस ऍक्टिवा गाडीने हे शिळफाटाच्या दिशेने जात होते, तेव्हा अपघाताची भीषण घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
खाडीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
ठाण्यातील कशेळी ब्रिज येथून उडी घेत एका व्यक्तीने मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अविनाश उतेकर (वय वर्ष 43 रा. वांगणी) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी थेट खाडीत उडी मारली होती. सदर माहिती मिळताच घटनास्थळी नारपोली पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरीक धावत आले. या सर्वांच्या मदतीने इसमास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असून सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. मात्र, व्यक्तीच्या चेहऱ्यावर व नाकाला गंभीर दुखापत झाली असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, पुढील तपास नारपोली पोलीस कर्मचारी करत आहेत.
हेही वाचा
जयंत पाटील गप्प बसले पण मी गप्प बसणाऱ्यातील नाही; जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांना इशारा