ठाणे : भिवंडी महापालिका परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस सुरू असून गेल्या तीन दिवसात 120 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर जून महिन्यामध्ये एकूण 886 नागरिकांना या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.  


भिवंडी महानगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणारे श्वान निर्बिजीकरण केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढीस लागलेली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना, दुचाकी चालकांना होत आहे. 


या भटक्या कुत्र्यांपैकी काही कुत्री पिसाळल्याने अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागली आहे. 7 व 8 जुलै या दोन दिवसात तब्बल 135 जणांना श्वान दंश झाल्याची घटना समोर आली आहे. 


एका महिन्यात 886 जणांचा चावा घेतला


जून महिन्यात तब्बल 886 जणांना श्वान दंश झाल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे. 7 जुलै रोजी कामतघर परिसरात 60 श्वान दंश झाले होते तर शांतीनगर भागात 8 जुलै रोजी 45 जणांना श्वान दंश झाले. या व्यतिरिक्त इतर भागातसुद्धा श्वान दंशाच्या घटना घडल्या असून या दोन दिवसात एकूण 135 रुग्णांना रेबीज प्रतिबंधक पहिला डोस देण्यात आला आहे. रुग्णालयात रेबीज डोसचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती अधीक्षिका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे.


कुत्र्यांचे निर्बिजीकरण केंद्र वर्षभरापासून बंद


भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा निर्बिजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद आहे. महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी 2023 पासून शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण  करण्यासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविली. परंतु संस्थांकडून प्रतिसाद आला नाही. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली होती. 8 जुलै रोजी या बाबतच्या फाईल्सवर स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी दिली आहे.


ही बातमी वाचा  :