नवी दिल्ली: रिलायन्स जिओला इंटर कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया(ट्राय)ने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन कंपनींना दणका दिला आहे. ट्रायने एअरटेल, आयडीया आणि वोडाफोन आदी कंपन्यांना रिलायन्स जिओला 3150 कोटींचा दंड ठोठावला आहे.


ट्रायने शुक्रवारी यासाठीचे पत्र दूरसंचार मंत्रालयाला पाठवले असून या पत्रात टेलिकॉम विभागाने यावर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. एअरटेल, आयडीया, वोडाफोनने पुरेसे इंटरकनेटक्टचे पॉईंट न दिल्याचा ट्रायचा ठापका ठेवत, त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे सुचना दिल्या आहेत.

ट्रायच्या या सुचनांमुळे वोडाफोन आणि एअरटेलला प्रत्येकी प्रति सेक्टर 50 कोटीच्या हिशेबाप्रमाणे 21 सेक्टरसाठी 1050 कोटी रुपये, तर आयडियाला प्रति सेक्टरसाठी 50 कोटी रुपयांच्या हिशेबाप्रमाणे 950 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

ट्रायच्या मते, या कंपन्यांच्या कॉल ड्रॉपची मर्यादा आखून दिलेल्या, नियमावलीपेक्षा अधिक आहे. तसेच रिलायन्स जिओसोबत इंटर कनेक्टिव्हिटी पॉईंटच्या मुद्द्यावरुन कॉल ड्रॉपची समस्या मान्य केली आहे.

रिलायन्स जिओने ट्रायकडे इतर टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, जिओच्या गरजेनुसार, इंटर कनेक्टिव्हिटी पॉईंट उपलब्ध करुन देत नसल्याचे म्हटलं होतं. या इंटर कनेक्टिव्हिटीच्या उपलब्धतेमुळे जिओ यूजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

मात्र, दुसरीकडे जिओचे सर्व आरोप इतर टेलिकॉम कंपन्यांनी फेटाळले होते. दरम्यान, ट्रायकडून नुकसान भरपाईसंदर्भातील शिफारस दूरसंचाल मंत्रालयाकडे केली आहे. ट्रायने म्हणल्याप्रमाणे, याचे परवाने रद्द करण्याचा निर्णय ग्राहकांच्या हिताचा नसल्याने यासाठी नुकसान भरपाई देणे योग्य असल्याचे म्हटलं आहे.