Reliance Jio 5G launch: जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून 5G सेवा आणि Jio True 5G आधारित वाय-फाय सेवा सुरू लॉन्च केली आहे. चेन्नईमध्येही आज जिओ 5G सेवा लॉन्च करण्यात आली आहे. यासह आता एकूण 6 शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू झाली आहे. याआधी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. आता Jio True 5G सेवा 6 शहरांमध्ये उपलब्ध आहे. जिओच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आधीच माहिती दिली होती. आकाश अंबानी यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात Jio True 5G आणि Jio True 5G पॉवर्ड वाय-फाय सेवा सुरू केली आहे.
या शहरांमध्ये राहणाऱ्या युजर्सनाही जिओच्या वेलकम ऑफरचा लाभ मिळणार आहे. Jio ची 5G सेवा सध्या देशभरात उपलब्ध नसून टप्प्याटप्प्याने सेवेचा विस्तार केला जाणार आहे, असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानीही श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात 5जी सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. 2015 मध्येही Jio 4G लॉन्च करण्यापूर्वी मुकेश अंबानी श्रीनाथजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्यात आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा लॉन्च करण्यात आली. 5G लॉन्च करताना ते म्हणाले की, देशात आता ही सेवा सुरु झाली, सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हे तंत्रज्ञान केवळ व्हॉईस कॉल किंवा व्हिडीओ पाहण्यापुरते मर्यादित राहू नये. याचा उपयोग क्रांती आणण्यासाठी व्हायला हवा, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात, देश अशा तंत्रज्ञानावर काम करेल ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर नेता येईल.
दरम्यान, एअरटेलने 8 शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. मात्र या सेवा अद्याप संपूर्ण शहरात उपलब्ध नाहीत. उलट त्या काही स्पॉट्सवरच लाइव्ह करण्यात आले आहेत. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुम्हाला 5G सेवेचा अनुभव घेता येईल. यातच जिओने अद्याप 5G रिचार्ज प्लॅन्सची घोषणा सध्या केली नसली तरी, जिओ आपल्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा अॅक्सेस करण्याची संधी मिळेल.